हिमायतनगर,दत्ता शिराणे । शहरापासून पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली जाणाऱ्या अर्धवट रस्त्याबाबत अनेकदा वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ठेकेदाराने अखेर भर पावसाळ्यात रस्त्यावर सोलींग गिट्टी अंथरण्याचे काम सुरू केले आहे. या अंतर्गत रस्त्यावर सोलींगवर माती मिश्रित मुरूम अंथरल्या जात असल्याने पावसाच्या पाण्याने चिखलाचे साम्राज्य पसरणार आहे. ठेकेदाराने जनतेच्या रेट्यामुळे व बातम्यांमुळें अखेर कामाला सुरुवात केली. परंतू या अंतर्गत रस्त्यावर पुन्हा एकदा चिखल झाल्याचे पहावयास मिळत आहे.

हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत कोट्यावधी रूपयांचा विकास निधी मंजूर झाला. जवळपास दोन वर्षांचा कार्यकाळ संपला मात्र या रस्त्याचे काम अतिशय कासव गतीने सुरू आहे. औरंगाबाद स्थित सिद्दीकी या ठेकेदाराने या कामाचे बारा वाजविले आहेत. कामाचा अवधी संपुष्टात येवून ही काम पुर्णत्वास आले नाही. ठेकेदाराने या विभागाचे शाखा अभियंता उप अभियंता व तसेच कार्यकारी अभियंत्याला मॅनेज करून सुधारीत मूल्यांकन करून निधी उचल केला.

मात्र कामाची अवस्था जैसे थे असल्याने नागरिकांना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होत असल्याचे वृत्त वर्तमान पत्रात छापून आल्यानंतर ठेकेदाराकडून परवाच या अंतर्गत रस्त्याचे काम हिमायतनगर कडून सुरूवात झाले आहे. पहिल्या उखडलेल्या रस्त्यावर सोलींग अंथरून त्यावर मुरूमाच्या नावाखाली माती टाकण्याचे काम सुरू असून, पाऊस पडल्यानंतर या अंतर्गत रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असल्याचे दिसून येत आहे. या कामाची सुरूवात होण्यासाठी अनेकानी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. याचे एकीकडे समाधान आहे. परंतू बोगस व निकृष्ट दर्जाचे काम या भागातील नागरिकांच्या माथी मारल्या जात असल्याने “कहिं खुशी कहिं गम ” असे म्हणण्याची वेळ या भागातील नागरिकावर आली आहे. काम कसे का होइना, थातूरमातूर ही सही काम होत असल्याचे समाधान असेही काही नागरीक बोलून दाखवीत आहेत.



परंतू हा रस्ता पुर्ण झाल्यानंतर किमान १५ वर्ष तरी या रस्त्याच्या कामांसाठी शासनाकडून कवडीचा ही निधी मिळणार नाही. याची ही भीती सुजाण नागरिक व्यक्त करीत आहेत. ठेकेदार मात्र मनमानी पद्धतीने काम पुर्ण करण्याच्या तयारीत असून मायेच्या लालसेपोटी प्रशासकीय यंत्रनेचा या बोगस व निकृष्ट कामाला छुपा पाठींबा मिळत असल्यामुळे की, काय? सर्व काही प्रकार अलबेल असाच चालू आहे. कार्यकारी अभियंता व तसेच अधिक्षक अभियंत्यानी या बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामांकडे जातीने लक्ष पुरवून अंदाज पत्रकानुसारच काम दर्जात्मक पुर्णत्वास न्यावे. अशी मागणी स्थानिक हिमायतनगर सह पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या भागातील नागरिकांतून पुढे आली आहे.

या अंतर्गत रस्त्यांचे काम तात्काळ सुरू करावे. या मागणीसाठी आम्ही लाक्षणिक उपोषण केले होते. तेव्हा ठेकेदार व प्रशासकीय यंत्रनने या रस्त्याची फारशी दखल घेतली नव्हती. परंतू प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनी बातम्या प्रकाशित करताच प्रशासन अलर्ट झाले. आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली खरी परंतू कामाची गुणवत्ता संपूर्णतः ढासळली आहे. आम्हाला असे वाटते की, रस्ता नाही तरी जुनाच बरा होता म्हणण्याची वेळ आमच्यावर आली आहे. तेव्हा संबंधित विभागांच्या वरिष्ठांनी या बाबीकडे तात्काळ लक्ष पुरवून गुणवत्तापूर्ण काम करावे. अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते डॉ. मनोज राऊत, संतोष गाजेवार, अनिल मादसवार, दशरथ हेंद्रे यांच्या सह या भागातील नागरिक शेतकऱ्यांनी केली आहे.

