हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरात नगरपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे जिकडे तिकडं घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याकडे प्रभारी मुख्याधिकारी यांच्यासह स्वच्छता विभागाच्या संबंधितांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असताना नागरिकांना जनजागृतीतून स्वच्छतेचा उपदेश केला जातो आहे. यापूर्वी शहरातील साफसफाईकडे नगरपंचायतीने लक्ष द्यावे अशी मागणी भाजप युवा मोर्च्याचे लक्ष्मण डांगे यांनी केली आहे.


अनेक महिन्यापासून शहरातील विविध प्रभागात नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाच्या संबंधितांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. असे असताना शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीने हिमायतनगर शहरात स्वच्छ सुंदर शहराचे धडे देत जनजागृती केली जात आहे. बुधवारी बसस्थानक परिसरात डिजिटल वाहनाद्वारे स्वच्छतेची माहिती दिली जात असताना येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण डांगे यांनी अगोदर शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या नंतर जनजागृती करा. नाहीतर घाण परिसरात येऊन माहिती द्या म्हणजे जणता तुम्हाला सांगेल असे सुनावताच जनजागृती करणारे वाहनाने या ठिकाणाहून काढता पाय घेतला आहे.


एकूणच जनजागृती करण्यासाठी शहरात येण्याअगोदर प्रत्येक नगरपंचायतीकडून स्वच्छतेची कामे बरोबर केली जात आहेत का? याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत लक्ष्मण डांगे यांनी व्यक्त केले आहे. शहरातील अनेक प्रभागात नाल्या तुंबून बाहेर पाणी येत आहे. यांची माहिती देऊनही नगरपंचायतीचे कर्मचारी इकडे महिनो महिने फिरकत नाही. कचरा नेणारी गाडीही आठ आठ दिवस येत नाही. त्यामुळे रोगराई वाढली आहे.



एखाद्या वेळेस नाल्या उपसले तर घाण उचलली जात नाही. उलट तीच घाण पुन्हा नालीत पडून नाल्या भरून जात आहेत. या प्रकारच्या दुर्लक्षित कारभारात हिमायतनगर नगरपंचायतीने तत्काळ स्वच्छतेच्या कामकाजात सुधारणा करून घाणीमुळे सर्वसामान्य जनतेला होत असलेल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वच्छतेवर भर द्यावा. नाहीतर या विरोधात आंदोलन करत हीच घाण नगरपंचायत कार्यालयात आणून टाकली जाईल असा इशारा भाजप युवा मोर्च्याचे लक्ष्मण डांगे यांनी दिला आहे.

