
हिमायतनगर, अनिल मादसवार | भक्तीमार्ग हि अंधश्रद्धा नाही हा विज्ञानाचा भाग आहे. कोणत्याही मंदिरामध्ये दर्शनासाठी जाताना भाविकांनी गर्भ ग्रहात थेट प्रवेश करू नये. कुणाला आतमध्ये जायचे असेल तर मंदिराचे पावित्र्य जपन्यासाठी ओल्या कपड्यात भगवंताचे दर्शन करावे. पावित्र्य जपता येत नसेल तर बाहेरूनच दर्शन करावे. मंदिराची पवित्रता टिकवणे ही फक्त व्यवस्थापनाचीच नव्हे, तर प्रत्येक भाविकाचीही समान जवाबदारी आहे, आणि ती कटाक्षाने पाळली गेली पाहिजे असे आवाहन परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी केले.



ते हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात पवित्र श्रावण महिन्यात अखंडपणे महिनाभर चालणाऱ्या ॐ नमः शिवाय नाम जाप यज्ञाच्या अनुषंगाने मंगळवारी झालेल्या बैठकीत उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. मंदिरात आगमन होताच प्रथमत स्वामींजींनी श्री परमेश्वर मूर्तिच मनोभावे दर्शन घेतलं, त्यानंतर व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतर मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून स्वामीजींचा स्वागत करण्यात आल. यावेळी पुढे मार्गदर्शन करताना बालयोगी व्यंकट स्वामी महाराज म्हणाले कि, “मानवी जीवनाचे खरे सार्थक भगवंताच्या नामस्मरणानेच साध्य होते. म्हणून सतत नामस्मरण करायलाच हवे.


जीवनात काही तरी चांगले कर्म हातून घडण्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावावे, आई वडिलांची सेवा करावी, साधू संतांचा आदर करावा, स्मशान भूमी स्वच्छतेत सहभागी व्हावे, पशु पक्षांना व भुकेल्याना अन्न पाणी द्यावं, अडल्या नडल्याची जमेल त्या पद्धतीने सेवा करावी.धर्माच्या कामात आणि चांगल्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन सेवा करावी. जिथे कुठं अन्नदानाच्या पंगती होत असतील तिथे सेवा द्यावी. मृत्युंनंतर काहींचं सोबत येत नाहीं.. सोबत येतात ती फक्त सत्कर्म म्हणून जीवनाच सार्थक करून घेण्यासाठी व पुण्य पदरी पाडून घेण्यासाठी भगवंताच्या नामस्मरण करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीं असेही त्यांनी सांगितलं.



मागील दोन वर्षापासून हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात ट्रस्टीच्या पुढाकारातून श्रावण महिन्यात अखंडपणे ॐ नमः शिवाय नामजप यज्ञ चालविला जातो आहे. यंदा यज्ञाचं तिसरं वर्ष असून, यावर्षी अत्यंत उत्साहात नामजप यज्ञात जास्तीत जास्त संख्येने सर्वानी सहभागी व्हावं. यासाठी ट्रस्टी आणि यज्ञ सोहळा समितीच्या लोकांनाही शहरातील प्रत्येक गल्लीबोळातील महिला पुरुषांना नामजप यज्ञासाठी प्रेरीत करावं. महिनाभर चालणाऱ्या यज्ञात महिला गटांनी सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत सहभाग घ्यावा आणि पुरुष भाविकांनी सायंकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत नामजप यज्ञात वेळ द्या. पवित्र नामजप यज्ञात सहभागी व्हा आणि जीवन धन्य करा असं आवाहन बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी केलं.




