हदगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील हरडफ येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेला ‘आनंद नगरी’ उपक्रम उत्साहात पार पडला. या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पुस्तकी शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कृतीतून व्यावसायिक कौशल्यांचे धडे आत्मसात केले.

‘आनंद नगरी’ अंतर्गत शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी विविध लघुउद्योगांचे स्टॉल उभारले. खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, शालेय साहित्य तसेच इतर उपयुक्त वस्तूंची विक्री करताना त्यांनी ग्राहकांशी संवाद साधणे, व्यवहार करणे, खर्च व नफा-तोट्याचा हिशोब मांडणे याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरतेची जाणीव निर्माण झाली.

“भविष्यात नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा आत्मविश्वास या उपक्रमातून मिळाला,” अशी भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. शिक्षणासोबत व्यावसायिक कौशल्याची जोड किती महत्त्वाची आहे, हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.


कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्य, गावचे सरपंच, प्रतिष्ठित नागरिक तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, आत्मविश्वासाचे आणि सादरीकरण कौशल्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मुख्याध्यापिका श्रीमती व्ही. एस. पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती आर. के. चाकोरे, जी. एम. वडजे, व्ही. के. नरवाडे, व्ही. एस. चुनाळे, श्रीमती एन. ए. माकोडे, डब्ल्यू. व्ही., श्रीमती एम. एस. कदम, पी. आर. गुरमे, डी. एस. जीवने आदी शिक्षकांच्या परिश्रमातून हा उपक्रम यशस्वी झाला. शाळेच्या या प्रयत्नाचे सर्वत्र स्वागत होत असून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण व स्वावलंबनाची बीजे रोवली जात आहेत.

