पारंपारिक शेती पद्धती आणि पारंपारिक पिके यांच्या ऐवजी आता विविध प्रकारची फळपिके आणि भाजीपाला पिकांचे उत्पादन, औषधी वनस्पतींची लागवड तसेच रेशीम शेती व त्यासोबतच कुक्कुट पालन, शेळीपालन आणि पशुपालनासारख्या व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड देऊन व्यावसायिक दृष्टिकोनातून “आज शेतात काय पिकते,त्यापेक्षा आज बाजारात काय विकते! हे अत्यंत महत्त्वाचे आहे, आणि त्या संकल्पनेतूनच केलेली प्रगती यामुळे शेती क्षेत्राचे स्वरूप पालटले जात आहे, त्यामुळे शेतकरी देखील आर्थिक समृद्धीच्या दिशेने आता वाटचाल करताना दिसून येत आहेत.


कुठल्याही गोष्टीत परिस्थितीनुसार किंवा काळानुसार बदल घडवणे हे विकासाच्या व आर्थिक बाबतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे असते, शेती क्षेत्रामध्ये याच पद्धतीने बदल करताना सध्या दिसून येत असून हे दिलासादायक एक चित्र आहे. अगदी याच मुद्द्याला धरून आपल्याला कंधार तालुक्यात असलेल्या लाठ (खु.) या छोट्याशा गावचे तरुण शेतकरी संतोष गवारे यांचे उदाहरण घेता येईल. ज्वारी,कापूस,तुर आणि सोयाबीन सारख्या पिकांना फाटा देऊन ते सध्या आधुनिक पद्धतीने संकरित भाजीपाला बीजोत्पादन करीत आहेत, त्यात या उत्पादनाद्वारे शेतीच्या माध्यमातून चांगला आर्थिक नफा मिळवत आहेत.



कंधार तालुक्यातील “लाठ” (खु.) या गावचे तरुण शेतकरी संतोष गवारे हे इतर शेतकऱ्यांप्रमाणेच अगोदर कापूस, सोयाबीन आणि तूर, हळद अशा पारंपारिक पिकांची लागवड करत असत. परंतु या पिकांच्या व्यवस्थापनावर करावा लागणारा खर्च आणि हातात येणारे उत्पन्न यांचा ताळमेळ काही बसताना दिसत नव्हता. त्यामुळे शेती करावी परंतु वेगळे काहीतरी करावे, हा विचार त्यांच्या मनामध्ये सतत चालू होता , पिकपद्धतीत बदल करणे हे काळानुरूप गरजेचे आहे हे त्यांनी ओळखले .


म्हणून यात बद्दल करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलताना त्यांनी अगोदर मोकळ्या शेतीत भाजीपाला घ्यायला सुरुवात केली. परंतु गेल्या कित्येक वर्षापासून अवकाळी पावसाचा किंवा इतर नैसर्गिक आपत्तीचा इतर शेतकऱ्यांना बराच फटका बसत आहे, तोच फटका भाजीपाला पिकांच्या बाबतीत संतोष यांना देखील बसला व यामुळे भाजीपाला पिकांचे देखील मोठे नुकसान झाले. अर्थात यासाठी टाकलेला पैसा वाया गेला व त्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला.


शेवटी यामध्ये देखील बदल करण्याचे ठरवले आणि गेल्या चार वर्षापासून आधुनिक पद्धतीने संकरित भाजीपाला उत्पादन करीत आहेत सिजेंटा मनसेंटा महेको आधी कंपन्यासोबत ही शेती करत असून त्यांना एकूण आठ शेडनेट मधून झुकीने मिरची टोमॅटो काकडी आदी भाजीपाला पिकांचे आधुनिक पद्धतीने बीज उत्पादन करीत आहे यामधून दरवर्षी लाखो रुपये उत्पन्न त्यांना मिळत आहे संतोष गवारे हे इतर शेतकऱ्यांनाही प्रेरित करून मार्गदर्शन करण्याचे कार्य करीत असून त्यांच्या प्रेरणेने लाट खुर्द व परिसरातील जवळपास 60 ते 70 शेतकरी या भाजीपाला बीज उत्पादनाकडे वळले आहेत.
तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संतोष गवारे हे आदर्श शेतकरी झाले आहेत. लाठ खुर्द हे शेडनेटचे गाव म्हणून प्रसिद्ध झाले असून येथील शेतकरी दरवर्षी कोठे उद्याची उलाढाल करीत आहेत आणि संतोष गवारे यांचे मार्गदर्शनाखाली कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, सिजेंटा, मनसेंटा सह इतर कंपन्या यांचे सहकार्य व मार्गदर्शन यामुळे संतोष गवारे आणि इंगोले या आदर्श शेतकरी जोड गोळीने आज हे छोटेसे “लाठ “(खू.)गाव नांदेड जिल्ह्याच्या नकाशावर आल्याचे दिसून येत आहे. यामध्ये त्यांना जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, व कृषी विज्ञान केंद्र सगरोळी,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळीने त्यांचा वेळोवेळी सन्मान केल्याने त्यांची प्रेरणा इतरही शेतकऱ्यांना मिळाली आहे, संतोष गवारे व इंगोले यांच्या आधुनिक पद्धतीने शेडनेटमध्ये संकरित विविध भाजीपाला पिकांचे बीज उत्पादन करत असल्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, कृषी आयुक्त धीरजकुमार, तात्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चळवदे, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राजेश धुर्वे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर सुरेश कुलकर्णी यांनी “लाठ”(खु.) येथे भेट देऊन संतोष गवारे,इंगोले यांच्यासह त्यांच्या इतर सहकारी शेतकऱ्यांच्या शेडनेट मधील संकरित भाजीपाला बीज उत्पादन शेतीची पाहणी करून शुभेच्छा देऊन सन्मानित केले.
यामध्ये संतोष गवारे यांनी शेतीमध्ये बदल केलाच व या करिता आर्थिक मदत मिळावी म्हणून नाबार्ड सारखा योजनांचा कौशल्याने वापर केला व शेतीमधून नवनवीन भाजीपाला पिकाच्या बीज उत्पादन व्यवसायास चालना देत आर्थिक समृद्धी कशी साधता येते याची प्रेरणाच इतर शेतकऱ्यांना घालून दिली. आणि आपल्यासह आपल्या इतर सहकारी शेतकऱ्यांना वर्षाकाठी लाखो रुपये या संकरित भाजीपाला बीज उत्पादनांमधून कमाई करून देत असल्याने संतोष गवारे यांनी भाजीपाला बीज उत्पादन व्यवसायाला भरभराटी आणून दिली आणि त्यातून आर्थिक फायदा करून दिला त्यामुळे संतोष गवारे यांचे परिसरामध्ये एक आदर्श तरुण शेतकरी म्हणून नाव घेतले जात आहे..
लेखक….माणिक भिसे, उस्माननगर, नांदेड.


