नायगाव| राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांचे बचत खाते होल्ड केले आहेत. ऐन पेरणीच्या हंगामाच्या तोंडावर शेतकरी बी बियाणे व खते घेण्यासाठी आर्थिक अडचणीत असताना बँकेकडून शेतकऱ्याला नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे बचत खात्याला लावलेले होल्ड तत्काळ काढावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी केली आहे.

आज निवेदन स्टेट बँक ऑफ नायगाव चे मॅनेजर इंगळे यांना देण्यात आले, निवेदनात असे म्हटले आहे, की खरीप हंगाम सुरू झालेला आहे .आमच्या बचत खात्यात असलेले पैसे हे आमचे हक्काचे आहेत ते आम्हाला काढण्याचा अधिकार आहे पण आमच्या अधिकारावर गदा आणून आमच्या बचत खात्यावर होल्ड लावण्यात आलेले आहे.बचत खात्याला होल्ड असल्याने निराधार योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, तसेच शेतमाल विक्री करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे, रोजगार हमी योजनेचे पैसे काढता येत नाही.

यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे. मात्र, बचत खात्याला होल्ड लावून कर्ज वसुलीची सक्ती करणे अन्यायकारक आहे. ही मागणी तात्काळ मान्य करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वतीने बँकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी उत्तम मोरे, शेख अजीम, आनंदा आकले, परमेश्वर वनशेट्टी इत्यादी शेतकरी उपस्थित होते.


शेतकऱ्याचे कर्ज माफ करावे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तीला आज अकरा वर्ष पूर्ण होत आहेत,पण देशातील शेतकरी हा कंगाल झालेला आहे तो कर्जबाजारी झालेला आहे, हे त्यांच्या धोरणामुळे म्हणून आमची मागणी आहे ,त्यांचे शिष्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली होती तो शब्द त्यांनी पाळावा आणि अकरा वर्षाच्या काळामध्ये सरकारच्या धोरणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे त्याला यातून बाहेर काढावे.

