श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे २५वे नांदेड जिल्हा अधिवेशन आज बुधवार दिनांक २८ मे रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात संपन्न झाले. अधिवेशनाची सुरुवात शहीद भगतसिंग यांना अभिवादन करून झाली.

अधिवेशनाचे उद्घाटन एसएफआयचे माजी नेते आणि डीवायएफआयचे अंकुश माचेवाड यांनी केले. अधिवेशनास एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी संबोधित केले तर शेतमजूर युनियनचे नेते कॉ. विनोद गोविंदवार यांनी अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या. अधिवेशन उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी विजय लोहबंदे होते तर प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन माहूरचे प्रफुल्ल कऊडकर यांनी केले.

अधिवेशनाच्या प्रतिनिधी सत्रात संघटनेचा कार्यात्मक, संघटनात्मक, आंदोलनात्मक आणि शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल मांडण्यात आला. त्याआधी शोक ठराव घेऊन आदरांजली वाहण्यात आली. अधिवेशनात वेगवेगळे ठराव पारित करण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरण २०२० रद्द करा, सर्व विद्यार्थ्यांना बस प्रवास निशुल्क करा, शासकीय आयटीआयचे खाजगीकरण थांबवा, जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी लढा तीव्र करा, विद्यार्थिनी व महिला अत्याचार विरोधी लढा तीव्र करा, यासहित विविध ठराव एकमताने या अधिवेशनात पारित करण्यात आले.


या अधिवेशनाने एसएफआयची १८ सदस्यांची नवीन जिल्हा कमिटीची निवड केली. यामध्ये एसएफआयचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष म्हणून विजय लोहबंदे आणि जिल्हा सचिव म्हणून मीना आरसे यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी प्रफुल्ल कऊडकर व स्वप्नील बुक्तरे तसेच जिल्हा सहसचिवपदी पवन जगडमवार व विकास गायकवाड यांची निवड करण्यात आली. जिल्हा कमिटी सदस्य म्हणून अक्षय सागरे, साहेबराव सोनसाळे, नितीन सोनकांबळे, अमोल गायकवाड, सोनल पाईकराव, नेहा कऊडकर, भारत पवार, शरद खंदारे, भीमराव सोनकांबळे यांची निवड करण्यात आली आहे. ३ जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.

अधिवेशनात जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयातून ८६ प्रतिनिधी सहभागी झाले होते. समारोपप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा सचिव आणि अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले. ‘हम होंगे कामयाब’ या गीताने अधिवेशनाचा समारोप झाला. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मुखेड तालुक्यातील एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

