श्रीक्षेञ माहूर| निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने वंचित बहुजन आघाडीचे संस्थापकीय अध्यक्ष तथा माजी खासदार अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची अकोला येथे जाऊन भेट घेतली आणि निम्न पैनगंगा प्रकल्पा ऐवजी सिरीज ऑफ बॅरेज बांधून ९५ गावातील दीड लाख लोकांना विस्थापन होण्यापासून वाचवावे तसेच समृद्ध जंगल व सुपीक जमीनही या प्रकल्पात बुडणार असल्याने ते सुद्धा वाचवावे अशी विनंती एका निवेदनातून केली, तसेच निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या विरोधात धरण विरोधी संघर्ष समितीने पुणे व औरंगाबाद न्यायालयात दावा दाखल केलेला असून न्यायालयात तारीख पे तारीख मिळत आहे. निर्णय काही लागत नाही ही बाब ही धरण विरोधी समितीने अॅड. आंबेडकर यांच्या लक्षात आणून दिली.
अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आपण या प्रकरणी येत्या एक-दोन दिवसातच मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याशी बोलू तसेच या आंदोलनाला मानवीय दृष्टिकोनातून जे काही सहकार्य देता येईल ते मी देणार असे आश्वासन धरण विरोधी संघर्ष समितीला दिले तसेच समितीने बाळासाहेब आंबेडकर यांना निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात एखादी जाहीर सभा देण्याची विनंती केली असता त्यांनी याबाबत लवकरच धरण विरोधी समिती ला कळवू असे आश्वासन दिले.
आता पर्यंत निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या आंदोलनात धरण विरोधी संघर्ष समितीने अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना, सामाजिक चळवळीतील नेत्यांना व कार्यकर्त्यांना या आंदोलनात सहभागी करून घेतले आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे संस्थापकीय अध्यक्ष उच्चशिक्षित, कायद्याचे ज्ञान असणारे माजी खासदार अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना समितीने निवेदन देऊन संघर्ष समिती सोबत जोडण्याचा प्रयत्न केल्याने आता हया आंदोलनाची विरोधाची धार अधिक तीव्र होणार अशा प्रकारे चित्र दिसत आहे.
अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना निवेदन देताना धरण विरोधी संघर्ष समितीचे संघटक सचिव व प्रसिद्ध प्रमुख तथा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर , धरण विरोधी संघर्ष समितीचे कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडे सर , सावळी सदोबा गावचे माजी सरपंच शेषराव मुनेश्वर , मनोहर बाहादे इत्यादी मंडळी उपस्थित होते.