Nanded : नांदेड जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे उद्घाटन; १२५ स्टॉलमधून कृषी उत्पादने व तंत्रज्ञानाचे प्रदर्शन

नांदेड | नांदेड येथे तीन दिवसीय जिल्हा कृषी व धान्य महोत्सव व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडले. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर १५ ते १७ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात १२५ विविध स्टॉल उभारण्यात आले असून कृषी उत्पादने, तंत्रज्ञान, शेतीपूरक उद्योग आणि सेंद्रीय उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध आहेत.


उद्घाटन प्रसंगी बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकरी हा देशाचा अन्नदाता असल्याचे सांगितले. उत्पादन वाढीसोबतच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असून शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)सारख्या आधुनिक साधनांचा वापर केल्यास उत्पादनवाढीस मदत होईल, असे त्यांनी सांगितले. शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असून नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला खासदार रविंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, कृषी उपसंचालक कैलास वानखेडे, उपसंचालक आत्मा अर्चना गुंजकर, किशोर स्वामी, प्रगतशील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



खासदार रविंद्र चव्हाण यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसोबत शेतीपूरक व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन केले. डिजिटल युगात जगातील शेतकऱ्यांशी स्पर्धा करताना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पीक पद्धतीत बदल, सेंद्रिय शेती आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबत नाविन्यपूर्ण पिकांचा अवलंब करून उत्पादकता वाढीवर भर द्यावा असे सांगितले. जिल्ह्यात रेशीम शेती, चिया सिड लागवड, सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय, बांबू लागवड तसेच शेतीतील यांत्रिकीकरण यांसारख्या उपक्रमांना प्रशासनाकडून प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

या महोत्सवात शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवाद, चर्चासत्रे, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, कृषी उत्पादनांचे प्रदर्शन तसेच खरेदीदार-विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.
महोत्सवात गहू, ज्वारी, तांदूळ, तूर, मूग, उडीद, चनाडाळ, हळद, मिरची, मसाले, गूळ, सेंद्रीय डाळी, मध, गुळाचा पाक, चटणी, लोणचे, पापड, कुरडई तसेच विविध फळे व भाजीपाला थेट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच लाकडी घाण्याचे करडई, भुईमूग, जवस व तिळाचे तेल, बांबू वस्तू, केळी वेफर्स, डिंक व बिब्याची गोडंबी यांचेही प्रदर्शन व विक्री करण्यात येत आहे.

या प्रसंगी ३६ प्रगतशील शेतकरी व महिला शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच www.nandedkrushimahotsav.in� या संकेतस्थळाचे उद्घाटनही करण्यात आले असून या पोर्टलवर सर्व स्टॉलधारकांची माहिती व संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी या कृषी व धान्य महोत्सवाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनांची खरेदी करून उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले.




