national highway bad | राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा, ठिकठिकाणी खड्डे अन् भेगा होऊन झालेय भगदाड – NNL

हिमायतनगर,अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील धनोडा ते भोकर राष्ट्रीय महामार्ग वाहनचालकांसाठी मृत्युचा सापळा बनला असून, इस्लापूर – हिमायतनगर – भोकर दरम्यान सरसम – सोनारी फाटा – याठिकाणी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जागोजागी सिमेंट काँक्रेट रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. या भागांमध्ये दुचाकी वाहनांचे चाक फसून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकांना कायमचे अपंगत्व येत असून, काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जमीन खचल्यामुळे या रस्त्याला तडे जाऊन आणि चार ते सहा इंचाच्या भेगा पडल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. सततच्या अपघातांमुळे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. संबंधित कामाची देखरेख करणाऱ्या अभियंत्यांचा स्वार्थीपणा आणि ठेकेदाराकडून झालेल्या निकृष्ट कामाचा हा परिणाम असून, यास जबाबदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करून कंपनीचे नाव काळ्या यादीत टाकावे. पडलेल्या भेगांची व भगदाडाची थातुरमातुर दुरुस्ती न करता ब्लॉक कट करून दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा याविरोधात आंदोलन उभारावे लागेल असा इशारा दत्ताभाऊ शिराणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.


या रस्त्याची निर्मिती होऊन अंदाजे पाच वर्ष लोटून गेली मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आणि जिल्हा प्रशासनाचे रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे केवळ कागदोपत्रीच वृक्षलागवड करून देयके तर उचलल्या गेली नाहीत ना…? असा प्रश्नही पुढे येऊ लागला आहे. महामार्गाचे रुंदीकरण आणि विस्तारीकरण करताना ४० ते ५० वर्षांपूर्वीची वड, पिंपळ, कडुनिंब यासह विविध वटवृक्षाची कत्तल करण्यात आली. नियमानुसार तोडलेल्या वृक्षांच्या ५ पट झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावणे बंधनकारक असताना संबंधीतांकडून सुरूवातीला काही ठिकाणी वृक्षलागवड केल्याचे नाटक फोटो सेशन करण्यापुरतेच केले. मात्र त्याचे संगोपन केले नसल्याने सध्या एकही झाड अस्तित्वात दिसत नाही. मात्र, वृक्षलागवाड, वृक्ष संगोपन आणि उन्हाळ्यात टँकरने पाणी दिल्याची बिले मात्र नियमित उचलल्या जात असल्याची शंका व्यक्त करण्यास वाव आहे. हि बाब लक्षात घेता भोकर – किनवट धनोडा पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड आणि संगोपण करावे असेही शिराणे यांनी म्हंटले आहे.

धनोडा ते भोकर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ चे काम मागील ६ वर्षांपासून बहुतांश ठिकाणी अद्याप रखडलेल्या अवस्थेत आहे. राष्टीय महामार्ग विभागाने ठेकेदारांच्या हितासाठी सदर रस्त्याचे तीन टप्पे करून तिन वेगवेगळ्या कंपन्यांना काम दिलेले आहे. अर्धवट रस्ता, खड्डे आणि पुर्ण झालेल्या कामाच्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत. तर अनेक ठिकाणच्या सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या आहेत. बहुतांश कामे अंदाजपत्रकाला फाटा देऊन संथगतीने केले असून, अनेक ठिकाणची कामे रखडलेल्या अवस्थेत आहेत. कामे पूर्ण होण्यापूर्वीच जागोजागी रस्ते उखडले आहेत. दुरुस्तीची कामे थातुरमातुर करण्यात येत असून पडलेल्या भेगा डांबर टाकून बुजवण्याचे प्रकार करण्यात देखभाल दुरुस्तीचा निधी उचल केला जात आहे.


महामार्गाचे काम सुरू होऊन जवळपास ६ वर्षांचा कालावधी लोटला असून, अद्याप काही ठिकाणी दोन रस्त्यांमधील दुभाजक अपूर्णच आहेत. काही ठिकाणी पुलांचे तर बहुतांश ठिकाणी नाल्यांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. तसेच सुरू कामाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक, बॅरीकेट्स लावलेले नाहीत. त्यामुळे अपघातांच्या घटनेत वाढ झाली आहे. कासवगतीने चालणारे काम संबंधित कंपनीने तातडीने पूर्ण करू द्यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ शिराणे यांनी पत्राकारांशी बोलताना केली आहे. या अर्धवट कामाची तक्रार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कार्यकारी अभियंता मुंबई यांना निवेदनाद्वारे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तात्पुरवु संबंधित प्रकरणात जबाबदार कंत्राटदार व प्रशासकीय आधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी प्रवाशी वर्गाच्या मागणीवरून केली आहे.




