नांदेड| मराठा समाजाची पुरोगामी चळवळ मोडून काढून सरकार मराठा समाजाची कोंडी करण्याचा घाट घालत आहे. त्यामुळे सरकारचे मनसुबे उधळून लावून मराठा समाजाबद्दल षडयंत्र रचणार्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी समाजाची पुन्हा एकदा ताकद दाखवून देण्यासाठी नांदेडमध्ये रविवार, दि. 27 जुलै रोजी वज्रमूठ राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत समविचारी मराठा समाजाच्या सर्व संघटनांचे संस्थापक अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी उपस्थित राहतील, अशी माहिती स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव देवसरकर (Madhav Devsarkar) यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात पुरोगामी चळवळीसाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा देणार्या संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला त्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे लढाऊ नेते विजय भैया घाडगे यांच्यावर लातूरमध्ये सत्ताधार्यांकडून झालेला भ्याड हल्ला, या घटना मराठा समाजासाठी चिंतनीय अशा आहेत. आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक लढा देणार्या मराठा समाजातील अनेक तरुणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे.

तरीही मुर्दाड सरकारला जाग येत नाही. त्यात समाजाच्या न्याय हक्कासाठी सामाजिक चळवळ उभारणार्यांना एक तर तुरुंगात डांबले जात आहे किंवा छुपा पाठिंबा देऊन सरकार हल्ले घडवून आणत आहेत. हे हल्ले थांबायचे असेल आणि समाजाचे होणारे नुकसान टाळायचे असेल तर पुन्हा एकदा मराठा समाजाने एकत्र येऊन नव्या लढ्याची तयारी करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील सर्व मराठा समाजाच्या समविचारी संघटनांचे संस्थापक अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते दि. 27 जुलै रोजी रविवारी दुपारी 2 वाजता नांदेड-आसना रोडवरील स्वागत लॉन्स, सांगवी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वज्रमूठ बैठकीला उपस्थित राहतील. मराठा समाजाच्या जास्तीत जास्त संघटनांनी यात सहभाग घ्यावा आणि पुन्हा एकदा आपल्या समाजाची ताकद सरकारला दाखवून द्यावी, असे आवाहन माधव देवसरकर यांनी केले आहे.



