किनवट, परमेश्वर पेशवे l महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिनांक २८रोजी किनवट तालुक्यातील इस्लापूर भागातील पर्यटनस्थळ स्थळ असलेले सहस्त्रकुंड ,परोटी, या भागाचा दौरा केला. सहस्रकुंड येथे सहस्रकुंड ट्रस्टचे सचिव सतीश वाळकीकर व वाळकी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ सुनीता बळीराम चव्हाण यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. मोठ्या उत्साहात बंजारा समाजातील समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषा धारण करत त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने परोटी तांडा या ठिकाणी हे आले होते.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलत असताना परोटी हे गाव माझे आजूळ असून या गावाशी व किनवट तालुक्यातील जनतेशी माझी ऋणानुबंधाची संबंध आहेत. तेव्हा मी जरी या राज्याचा मंत्री असलो तरी तुमच्या आशीर्वादाने मंत्री पदावर विराजमान आहे. हे मी कदापीही विसरणार नाही. या भागातील जनतेचे पाणीटंचाईचे प्रश्न व अडचण लक्षात घेऊन सहस्त्रकुंड या ठिकाणी उच्च पातळीचे दोन बंधारे बांधण्यासाठी मी शासन दरबारी सदैव प्रयत्नशील राहील अशी ग्वाही त्यांनी या सत्कार सोहळ्याप्रसंगी परोटी वासियांना दिली. एवढेच नव्हे तर किनवट तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू.


या कार्यक्रमाचे प्रसंगी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम, हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कोहळीकर, राष्ट्रवादीचे नेते बेबीताई प्रदीप नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. जनाबाई डूडूळे,यादव जाधव, महावीर शेठ, प्रफुल्ल राठोड, किनवट नगरीचे माजी नगराध्यक्ष आनंद मच्छैवार बाबुराव केंद्रे ओबीसी नेते ,आदिवासी नेते गोविंद अंकुरवाड, दक्षिणचे भाजपा तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरडकर, उत्तरचे अध्यक्ष उमाकांत कराळे, शहराध्यक्ष स्वागत आयलेनीवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड, दत्तराव मोहिते, सौ शांताबाई दासरवाड,अनिल पाटील, तुकाराम बोनगीर ,सभापती शिवाजी पाटील घोगरे, कराळे, बालाजी बामणे यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्व पाहुणे मंडळींचा परोटी ग्रामस्थांच्या वतीने भव्यदिव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांनी या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मंत्री महोदयांनी आम्हाला सहकार्य करावे अशी रास्ता अपेक्षा व्यक्त केली.


माझ्यापेक्षा वयाने लहान जरी असला तरी आपण मंत्रिमंडळात आहात आपण राज्यमंत्रीच नव्हे तर कॅबिनेट मंत्री व्हावे व या दुर्गम भागाचा विकास साधावा अशा स्वरूपाच्या शुभेच्छा सुद्धा द्यायला आमदार केराम विसरले नाहीत. या कार्यक्रमासाठी किनवट तालुक्यातील राष्ट्रवादी भाजपच्या व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. व परिसरातून हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित झाले होते.


