हिमायतनगर, अनिल मादसवार। नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रं. 11 व 12 मध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, नगरपंचायत पाणी समस्या सोडवण्यासाठी डोळेझाक करत आहे, त्यामुळे परिसरातील अनेक बोअर पाणी असून, मोटरपपं नसल्याने बंद आहेत. तर अधिग्रहण केलेल्या बोरवरून पाणी पुरवठा होत नसल्याने पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. या प्रकारास वैतगलेल्या शेकडो महिलांनी युवा कार्यकर्ता लक्ष्मण डांगे यांच्या नेतृत्वाखाली पाणी द्या,, पाणी द्या,,, म्हणत नगरपंचायत वर घागर मोर्चा काढून दोन तास ठिय्या मांडून तात्काळ पाणी पुरवठा करण्यासह बंद पडलेल्या बोअर सुरू होण्यासाठी इसापूर धरणातून टेम्भुर्णी मार्गे कैनॉलद्वारे पैनगंगा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे. एव्हढंच नाहीतर येथून किनवट जिल्ह्यात जाणारे मंत्री इंद्रनील नाईक यांना देखील महिलांनी निवेदन देऊन साकडे घातले आहे.


विदर्भ मराठवाडा सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदीच्या काठावर हिमायतनगर शहर असून, येथील कारभार नगरपंचायत तर्फे चालविला जातो आहे. शहरातील बहुतांश प्रभागातील पाणी समस्या गंभीर बनली आहे. वार्ड क्रं. 11 व 12 मध्ये बहुतांश लोक मजुरदार, शेतमजुरदार, शेतकरी आहेत. त्यांना दिवसभर कामे करावे लागतात मात्र उद्भवलेल्या पाणी टंचाईमुळे त्यांना पाण्याकरीता वनवन भटकावे लागते आहे. यामुळे त्यांच्या रोजगारावर परिणाम होत आहे.


हिमायतनगर शहराला 19 कोटी 19 लाख ची नळयोजना मंजुर असुन, सदर नळयोजनेचे काम हे अर्धवट अवस्थेत आहे. कारण सदर नळयोजनेची काम करण्याची मुद्दत ही 1 वर्षापुर्वीच संपली असुन, आजपर्यंत नळ योजनेचे काम पुर्ण झालेले नाही. यामुळे हिमायतनगर वासीयांना पाणी टंचाईच्या झळा पोहचत आहेत, मार्च महिण्यापासून पाणी टंचाई जाणवत असताना नगरपंचायत प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना केली नसल्याने पाणी समस्येने उग्र रूप धारण केले आहे. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेवुन नगर पंचायतने वार्ड क्र. 11 व 12 मध्ये नविन बोअरवेल मारुन द्यावे आणि शहरातील 100 ते 150 फुटवरील बोअरला पाणी यावं म्हणून पैनगंगा नदी मध्ये इसापुर धरणामधुन टेम्भुर्णी भागांतील कैंनोलच्या माध्यमातून पाणी सोडुन हिमायतनगर शहरवासीयांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.

मोर्चाची दखल घेत तात्काळ अधिग्रहित बोअरमध्ये मोटरपंप टाकून सार्वजनिक विहिरीत पाणी सोडण्यात येईल आणि दोन दिवसांत नवीन बोअर आणि जुन्या बोअरवेल दुरुस्ती करून पाणी देण्याचे आश्वासन कार्यालयीन अधीक्षक महाजन यांनी दिलेल्या अश्वसनाने मोर्चा मागे घेण्यात आला असला तरी दोन दिवसात हिमायतनगर शहराला पाणी पुरवठा करुन जनतेची होणारी भटकती थांबवावी. आणि शहरास त्वरीत पाणी पुरवठा न केल्यास लोकशाही मार्गाचा अवलंब करुन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनाचे नेतृत्व करणारे लक्ष्मण डांगे व मोर्चात सामील महिलांनी दिला आहे.

जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट पाणी टंचाईग्रस्त नागरिकांनी घेतली
किनवट तालुक्यातील एका कार्यक्रमासाठी हिमायतनगर येथून जात असलेले महाराष्ट्र राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट पाणी टंचाईच्या घागर मोर्चातील महिला पुरुषांनी घेऊन निवेदन दिले आहे, आणि हिमायतनगर शहराची अर्धवट नालयोजना कार्यान्वीत करावी आणि इसापूर धरणातून पाणी सोडावे अशी मागणी केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण डांगे, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, कॉ दिगंबर काळे, भाजप तालुका अध्यक्ष गजानन चायल, मुन्नाभाऊ शिंदे, गणेश रचेवार, आदींसह शेकडो महिला, बालगोपाल, महिला पुरुष नागरिक उपस्थित होते.