देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील अनेक नदीकाठच्या गावांना सततच्या मुसळधार पावसामुळे पूर आला असून, शेतजमिनी मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेल्या आहेत. संपूर्ण मतदारसंघातील तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून करडखेड, मरखेल, हाणेगाव, आरळी यासह अनेक गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार जितेश अंतापूरकर यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याशी संपर्क साधून प्रशासनाने तातडीने मदतकार्य हाती घ्यावे, असे निर्देश दिले. तसेच स्थानिक प्रशासनाने सतर्क राहून नागरिकांशी सतत संपर्क ठेवावा, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

पूरग्रस्त शेतकऱ्यांचे मोठे नुकसान लक्षात घेता तात्काळ पंचनामे करावेत, तसेच मतदारसंघातील पूरस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असेही त्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचित केले. शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहत, मदतकार्य वेगात व प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन आ. अंतापूरकर यांनी प्रशासनास केले आहे.



