वाळकेवाडी/हिमायतनगर, शंकर बरडे| हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या ग्रामपंचायत दुधड-वाळकेवाडी अंतर्गत येणारी जिल्हा परिषद शाळा उखळवाडी येथील शिक्षक दांडी मारत असल्याचा प्रकार शनिवार दि ५ जुलै रोजी समोर आला आहे. शाळेचा दिवस असून सुद्धा शाळेला कुलूप दिसले विद्यार्थी शिक्षकांची वाट पाहत होती पण शाळेच्या शिक्षकांला मात्र आपले घर सुटत नव्हते.


जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक मनमानी कारभार करत कधी वेळेवर उपस्थित राहतात तर कधी उखळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावून शाळेतील विद्यार्थ्यांच्या भविष्याने खेळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दिनांक ५ जुलै रोजी उखळवाडी येथील ग्रामस्थ व गावकऱ्यांना हा प्रकार लक्ष्य येताच त्यांनी हा प्रकार नागरिकांसमोर उघड केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी भेट देऊन शिक्षकांच्या रिक्त जागा भरून शिक्षणाची हेळसांड थांबवा असे निर्देश गटशिक्षण अधिकारी याना दिले. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिक्षकाने दांडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे.

हिमायतनगर तालुक्यातील दुधड-वाळकेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणारी उखळवाडी येथे शासनाकडून लाखो रुपये खर्च करून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या लेकरांना शिक्षण घेण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी हजारो रुपये पगार देऊन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेले आहे. परंतु उखळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक कधी गैरहजरीत राहत आहेत. तर कधी शाळेला कुलूप लावून मनमानी कारभार करत सर्वसामान्य जनतेच्या लेकरांच्या शिक्षण व भविष्य धोक्यात अनंत आहेत.



केवळ शाळेला जात असल्याचे दाखवून शासनाची दिशाभूल करत हजारो रुपयांची पगार आपल्या कामात व्यस्त राहून घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकारी व तालुका गटशिक्षण आधिकारी हिमायतनगर यांचे मात्र साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच कि काय उखळवाडी येथील शाळा उघडली नसल्याने गावकऱ्यांनी उखळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर दिनांक ५ जुलै रोजी जाऊन पाहणी केली. यावेळी शाळेवर शिक्षक गैरहजर राहुन शाळेतील लेकरांना सुट्टी देऊन शाळेला कुलूप असल्याचे दिसून आले. याबाबत उखळवाडी येथील नागरिकांनी शाळेतील मुख्याध्यापक यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क झाला नाही.

शिक्षकांच्या मनमानी कारभारामुळे उखळवाडी येथील सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी जनतेच्या लेकरांना शिक्षणापासून वंचित ठेऊन त्यांच्या भविष्यासोबत शिक्षकाकडून खेळ चालविला जात असल्याचा आरोप शिक्षणप्रेमी पालकांनी केला आहे. उखळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर असलेल्या शिक्षकांची तात्काळ चौकशी करून कोणाच्या आदेशावरून शाळेला कुलूप लावण्यात आले होते. याचा अजब विचारावा आणि संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या बाबींकडे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ लक्ष देवून विद्यार्थीयांच्या भाविष्याशी खेळणाऱ्या शिक्षकांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्याकडून करण्यात आली आहे.



