हदगाव, गौतम वाठोरे | हदगाव येथील एका युवकाच्या आत्महत्येप्रकरणी संबंधितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मृताच्या कुटुंबीयांनी केली असून, यासंदर्भात पोलिसांकडून विलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तीन दिवसांपूर्वी अनिल गणेशराव शिंदे या युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांनी हदगाव पोलीस ठाण्यात तक्रार देत काही व्यक्तींनी मानसिक छळ केल्यामुळेच हा टोकाचा निर्णय घेतल्याचा दावा केला आहे. मात्र, तक्रार दिल्यानंतरही अद्याप संबंधितांवर गुन्हा दाखल झालेला नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वाहन अपघाताच्या प्रकरणातून वाद निर्माण झाला होता. अपघाताच्या भरपाईपोटी मोठ्या रकमेची मागणी व कथित धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या मानसिक तणावातून अनिल शिंदे यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या भावाने केला आहे.


दरम्यान, पोलिसांकडून तक्रारीची चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कारवाई होत नसल्याने कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या घटनेमुळे शहरात विविध चर्चा सुरू असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित प्रकरणात अधिकृत भूमिका जाणून घेण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

