उमरखेड| यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात काल शुक्रवार पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावोगाव पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक भागांचा संपर्क तुटला आहे.


शेतीमध्ये पाणीच पाणी झाले असून, उभ्या पिकांचा नायनाट होऊन, घरांमध्ये कंबरभर पाणी, जनावरं वाहून जाण्याचे प्रकार समोर आले आहेत. निसर्ग कोपल्याने शेतकरी व कष्टकरी वर्ग हतबल झाला आहे. कधी नव्हे तेवढा पाऊस होत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले असून, शेतकरी तरी पुरता नागवला गेला आहे. शासनाची चिमूटभर मदत शेतकऱ्यांच्या जखमा भरू शकत नाहीत अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत असून, शासनाने हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना वाचवावे अशी मागणी केली जात आहे.


एव्हढी मोठी विदारक परिस्थिती उद्भवली असताना प्रशासनाने अजून पाहणी केली नसल्याने नागरिक नाराज आहेत. शेतकऱ्यांची मागणी आहे कि, शासनाने १००% ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, पुनर्वसन करून मदतकार्य सुरू करावे. हवामान खात्याने पुढील ३-४ दिवस अजून पावसाचा इशारा दिल्याने भीतीचं वातावरण आहे. लोकप्रतिनिधींनी तातडीने पुढे यावे, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.



