नांदेड| शहरातील जगमवाडी येथून निघालेली लाईन छत्रपती शाहू महाराज चौक, उल्हासनगर, पाटबंधारे नगर,जेतवन नगर, वैशाली नगर,तरोडा बु. व खु.ते सांगवी भागातील दाट लोकवस्तीतून गेलेली उच्चदाब विद्युत वाहिनी नवीन लिंक लाईन कॅनाल रोड ने टाकण्यात यावी यासाठी या भागातील नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने आज दि. 22 जुलै 2024 रोजी महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता डोये साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता जाधव साहेब यांचीही यावेळी उपस्थिती होती.

नांदेड शहरातील तरोडा बु. व खु. भागातून 33 के.व्ही. ची वीज वाहिनी गेली असून पूर्वी या भागात विरळ वस्ती असल्यामुळे त्याचे कोणालाही काही वाटत नव्हते. परंतु आता या भागात वस्ती वाढ होऊन यापासून अनेकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे व या वीज वाहिनीमुळे आतापर्यंत अनेकांचे जीवही गेले आहेत. त्याबाबत वेळोवेळी या भागातील नागरिकांनी संबंधितांशी पत्रव्यवहार करुन सदर वीज वाहिनी हलवण्याची मागणी केली. परंतु याकडे लोकप्रतिनिधीसह महावितरणच्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सदर काम थंड बस्त्यात पडून राहिले.

यंदाच्या उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर तेजाने सदर तारा प्रसारण पावून अनेकांच्या घराला चिटकण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे भविष्यात आणखी उष्णता वाढली तर सदर तारा घरांना चिटकून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिक आता सजग झाले असून सदर तारा कॅनॉल रोडने काढण्याच्या मागणीकरीता लोकप्रतिनिधींसह महावितरण अधिकार्यांच्या भेटीगाठी घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याकरीता प्रयत्न करत आहेत. त्यास लोकप्रतिनिधींसह महावितरणचे अधिकारीही सकारात्मक प्रतिसाद देत असल्यामुळे सदर वीज वाहिनी लवकरच निघण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे या भागातील नागरिकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.


आज महावितरणचे मुख्य अभियंता यांना निवेदन देताना आनंदराव गायकवाड, एस.पी. राखे, तुकाराम अटकोरे, चंद्रकांत रावणगावकर, किशनराव ढवळे, पापुलवार, ढवळे, अॅड. मिलींद कदम, तुकाराम कांबळे, सुनील बेंद्रीकर आदींची उपस्थिती होती.


