नांदेड | जिल्ह्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा व दिलेली उद्दिष्टे विहित वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून कार्य करावे, अशा सूचना प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेच्या केंद्रीय नोडल अधिकारी तथा भारत सरकार राजभाषा विभागाच्या संयुक्त सचिव डॉ. निधी पांडे यांनी दिल्या.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाशी संलग्न विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. देशमुख, कृषी उपसंचालक श्री. वानखेडे, प्रकल्प उपसंचालक आत्मा अनिल शिरफुले, जलसंधारण अधिकारी कांबळे, रेशीम विभागाच्या तंत्र अधिकारी कांचन जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


डॉ. पांडे म्हणाल्या की, जिल्ह्यासाठी कृषी विभागाने तयार केलेल्या जिल्हा आराखड्यात आवश्यक त्या सुधारणा करून उद्दिष्टपूर्ती वेळेत करावी. तसेच यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या यंत्रसामुग्रीबाबत त्यांचा अभिप्राय व अडचणी जाणून घ्याव्यात. शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून व्हॉट्सअॅप गटांच्या माध्यमातून समन्वय साधावा व त्यांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.


यावेळी कृषी विभागामार्फत जिल्ह्यात एआयचा वापर, चिया व मका लागवडीस प्रोत्साहन, 1 लाख जलतारा उद्दिष्ट, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप, फार्मर कपतर्फे 550 शेतकऱ्यांना तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण, महाडीबीटी अंतर्गत लाभ वितरण, यांत्रिकीकरण, तसेच रब्बी हंगामातील पेरणी आदी बाबींचे सादरीकरण करण्यात आले.

तसेच पशुसंवर्धन विभागाच्या योजना, महारेशीम अभियानाची उद्दिष्टपूर्ती, रेशीम शेतीचे फायदे, मत्स्यव्यवसाय विभागाची शेततळे व मत्स्यपालनातील कामगिरी, पशुसंवर्धनातील लसीकरण व दूध उत्पादनवाढीच्या उपाययोजना यांची माहिती देण्यात आली. यासोबत जिल्हा उपनिबंधक, ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा उद्योग केंद्र, फार्मर कप, सिंचन, जिल्हा जलसंधारण विभाग, नाबार्ड, कापूस संशोधन केंद्र, अग्रणी बँक आदी विभागांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सर्व विभागांचे काम सुव्यवस्थित सुरू असून पशुसंवर्धन विभागाचे कार्य विशेष प्रगतीपथावर असल्याचे नमूद केले. तसेच मत्स्यपालन क्षेत्रातही जनजागृती वाढताना दिसत असल्याचे सांगितले. सर्व योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
“प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना” अंतर्गत आज सकाळी नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथील रेशीम शेती व विविध केंद्र पुरस्कृत योजना याबाबत संयुक्त सचिव डॉ. निधी पांडे यांनी पाहणी दौरा केला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत व तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल व संपूर्ण चमू व रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

