नांदेड l अहिल्याबाई होळकर यांचे विचार म्हणजे सामाजिक न्याय, धार्मिक समभाव, प्रशासकीय कार्यक्षमता आणि महिला सबलीकरण यांसारख्या मूल्यांवर आधारित होते. त्यांनी आपल्या राज्य कारभारात हे विचार प्रत्यक्षात आणले. त्या एक सक्षम प्रशासक, न्यायप्रिय आणि धर्मनिरपेक्ष शासक होत्या असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी काढली जाणारी श्रीक्षेत्र माळेगाव ते चौंडी रथयात्रेचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल यात्रेचे संयोजक तथा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे महाराज यांचा हॉटेल सेंट्रल पार्क येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ बोकारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ विधीतज्ञ श्री शिवाजीराव हाके, बालाजी काळे, मुरहरी कुंभारगावे, नीळकंठ उराडे, संजीव म्हेत्रे, परसराम वडजे, श्रेयस कुमार बोकारे, गोविंद गोरे, लक्ष्मण धुळगुंडे,कांचन शेळके यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मागील ११ वर्षा पासून अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त रथयात्रा काढली जाते.

अहिल्याबाई होळकर यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचले जावेत हा मुख्य उद्देश ठेऊन ही रथयात्रा काढली जाते. यासाठी सर्वांचं सहकार्य लाभत आले आहे असे यात्रेचे संयोजक तथा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे यांनी सांगितले. अहिल्याबाई होळकर यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात. त्यांचे जीवन आणि कार्य आपल्याला एक चांगला नागरिक बनण्यास मदत करते असे ज्येष्ठ विधीतज्ञ श्री शिवाजीराव हाके यांनी सांगितले.



