
हदगाव/हिमायतनगर/नांदेड| हदगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे सुरू असलेल्या पवित्र श्रीराम कथेत कथाव्यास राधाकृष्ण जी महाराज यांनी हिंदू-शीख एकात्मता, श्रीरामांचे सार्वत्रिक महत्त्व आणि समाजातील ऐक्याची गरज यावर प्रभावी विचार मांडत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक व भावनिक संदेश दिला.



महाराज म्हणाले की, हिंदू आणि शीख धर्म हे एकमेकांना पूरक असून त्यांच्या तत्त्वज्ञानाचा पाया समान आहे. गुरु गोविंदसिंग जी, गुरु तेग बहाद्दूर आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानामुळे धर्मरक्षणाची परंपरा आजही टिकून असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हिंदू समाजातील विविध जाती-पंथ एकत्र आले नाहीत, तर रामराज्याचे स्वप्न अपूर्ण राहील, असे सांगत त्यांनी अंतर्गत ऐक्य आणि बंधुभावाचे महत्त्व स्पष्ट केले.


इंडोनेशियातून रामाचे वैश्विकत्व
इंडोनेशियासारख्या मुस्लिम बहुल देशातही श्रीरामांचा आदर केला जातो, याचे उदाहरण देत त्यांनी रामाचे सार्वत्रिक अस्तित्व अधोरेखित केले. गरुडा इंडोनेशिया विमानसेवेचे नावही विष्णूच्या वाहनावरून ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.



‘राम’ म्हणजे त्याग, सेवा आणि प्रेम
श्रीरामांच्या जीवनातील केवट प्रसंग सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, गरीब, दुःखी आणि संतांची सेवा करणाऱ्यांवरच रामाची कृपा होते. “स्वतः दुःख सहन करून इतरांना सुख देणारे नाव म्हणजे राम,” असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.


घराघरात ‘रामायण’ घडू द्या
ज्या घरात परस्पर आदर, प्रेम आणि आपुलकी असते, तेथेच खऱ्या अर्थाने ‘रामायण’ घडते, असे सांगत त्यांनी कुटुंबमूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. नांदेड ही गुरु गोविंदसिंग जी यांच्या कार्यामुळे पावन झालेली भूमी असल्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले.

एकात्मतेतूनच सत्कार्य
उत्साह, आशीर्वाद आणि परस्पर सहकार्य यामुळेच कोणतेही सत्कार्य घडते, असा सकारात्मक संदेश देत त्यांनी समाज हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. एकूणच, पिंपळगाव येथील ही श्रीराम कथा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता समाजाला एकत्र आणणारा, मूल्यांची जाणीव करून देणारा आणि ‘रामतत्त्व’ जागवणारा प्रेरणादायी सोहळा ठरत आहे.
संतांचे दर्शन भेट म्हणजे वैकुंठाहूनही श्रेष्ठ गोष्ट आहे आणि ती आज पिंपळगाव येथे श्री राम कथा दरम्यान आम्हास घडली ते आम्ही सदभाग्य समजतो. सिख धर्म व हिंदू धर्म यांचे मूळ तत्व एकच असून आम्ही गुरुबाणीला देव मानतो तर हिंदू धर्मात रामकृष्ण महादेव आदींना देव मानतात ते देवाचे तत्व गुण गातात त्यांना साधुसंत म्हणतात ते आपल्याला देवा प्रयत्न होऊन पोहोचवितात अशा प्रकारच्या कथा सत्संग होणे काळाची गरज असून, यातून धार्मिक वातावरण निर्माण होऊन अध्यात्मिक सत्संग घडतो नवतरुणांना आध्यात्मिक ज्ञान समाधान त्याचबरोबर जीवन जगण्याचे साधन मिळते मंत्र मिळतो तो फक्त या अशा कार्यक्रमातूनच. – ग्यानी तणवीरसिंग बाबा, नांदेड



