Mahur Kailash Hill : श्रावणाच्या पूर्वदिनी कैलास टेकडीवर भाविकांची मांदियाळी

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर | श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावर असलेल्या कैलास टेकडीवर श्री दत्त भक्तांची प्रचंड गर्दी होत आहे. आज दि.२४ रोजी दर्श अमावास्ये निमित्ताने पहाटे पासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून, संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. यामुळे माहूर गडावरील मंदिर गर्दिने फुलले आहे.



श्रावण महिना सुरु झाला की, अनेक सण-उत्सवांना सुरुवात होते. हिंदू धर्मात सगळ्यात महत्त्वाचा आणि पवित्र महिना हा श्रावण मानला जातो. या महिन्यात माहूर गडावरील कैलास टेकडीवर सुद्धा अमावस्या व दर सोमवारी हजारो भाविक येत असतात. माहूर येथील कैलासटेकडी ही सहयाद्री पर्वतावरील सर्वात उंच टेकडी असून अत्यंत जागृत ठिकाण आहे. दत्तात्रयांच्या पादुका येथे असून, भाविकांनी भगवान दत्तात्रेयांच्या पादुकांना जलाभिषेक आणि आरती करून आपल्या श्रद्धेची प्रचिती दिली. या ठिकाणी भगवान दत्तात्रेयांनी गोरखनाथांना दर्शन दिले होते असे हे पवित्र ठिकाण असल्याची आख्यायिका आहे.


“ब्रम्हा- विष्णू- महेश” तिघांचा संगम असलेल्या दत्तात्रेयांच्या पादुका दर्शनाने कैलास टेकडीवर भाविकांसाठी एक पवित्र आणि आध्यात्मिक अनुभूती मिळवण्याचे हे एक महत्त्वाचे स्थळ ठरत आहे. गत ५ वर्षात येथे येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड वाढली आहे. अमावस्येला येथे दर्शनासाठी मोठी गर्दी असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कैलास टेकडीवर जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. काही भक्त पायी चालत तर काही डोंगर चढून मनोकामना पूर्ण होण्यासाठी व्रतस्थ होऊन येत आहेत. अशात दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मोठ्या संख्येने या मार्गावर हमखास वाहतूक कोंडी होते आणि भाविकांना तासनतास ताटकळत थांबावे लागते. ही नेहमीची समस्या दूर करण्यासाठी किमान २ वाहतूक पोलिस नेमावेत अशी मागणी होत आहे.






