हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्यात सध्या तूर पिकाच्या काढणीला वेग आला असला तरी बदलत्या हवामान व ढगाळ वातावरणामुळे शेतकरी बांधवांमध्ये पिकांच्या सुरक्षिततेबाबत तीव्र चिंता निर्माण झाली आहे. अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांकडून घाईगडबडीत तूर काढणीची लगबग सुरू आहे.

यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यामुळे उरलेल्या तुरीवर शेतकऱ्यांची मोठी आशा होती. मात्र प्रत्यक्षात तुरीचा उतारा मोठ्या प्रमाणात घटल्याने उत्पादनात लक्षणीय घसरण झाली आहे. परिणामी खरीपातील नुकसान भरून काढणे शेतकऱ्यांसाठी अवघड बनले आहे.

तूर पेरणी, तीन वेळची फवारणी, कापणी ते गोळा करणे, मळणी यंत्रातून बाहेर काढणे, ओलसर असल्याने वाळवणे आणि घरापर्यंत वाहतूक करणे यासाठी प्रति क्विंटल सुमारे 6 हजार रुपये खर्च येत आहे. मात्र बाजारात सध्या मिळणारा कमी दर पाहता पिकावर झालेला खर्चही निघणे कठीण झाले असून शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.



आता शेतकऱ्यांची भिस्त रब्बी पिकांवर आहे. परंतु सध्या सुरू असलेल्या ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा, करडईसह इतर रब्बी पिकांनाही नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत खरीपापाठोपाठ रब्बी हंगामही शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

एकूणच हवामानातील अनिश्चितता, उत्पादन घट आणि बाजारभावातील घसरण यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून, शासनाने तातडीने हमीभाव, नुकसानभरपाई व बाजार हस्तक्षेप करावा, आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.
