जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा तहसील,समाज कल्याण, जिल्हा परिषद,पंचायत समिती,फॉरेस्ट, आरटीओ,कामगार कार्यालय तसेच पोलीस खाते असो वा इतर कार्यालये, अडल्या नडल्या साठी कॉम्रेड गंगाधर गायकवाड म्हणजे एक सर्व समावेशक गुणकारी औषध आहे.


त्यांनी अनेक जाती धर्मातील अडचणीत सापडलेल्या पीडितांना मदत केली आणि करत आहेत. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नांदेड तालुका सचिव व सीटू कामगार संघटनेचे सरचिटणीस म्हणून काम पाहतात.त्यांची आजपर्यंतची वाटचाल खडतर आणि संघर्षशील आहे. त्यांनी आजपर्यंत कधी तडजोड केली नाही. तसे ते मुळचे माहूर तालुक्यातील वझरा शेख फरीद गावचे.परंतु त्यांचे बालपण नांदेड मध्येच गेले. किनवट येथे आठवी नववीत असताना शासकीय वसतिगृहात ते एसएफआय या विध्यार्थी संघटनेचे सभासद झाले.नंतर अखिल भारतीय किसान सभा,डीवायएफआय,सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) संघटनेत काम करू लागले.


अशातच ते १९९४-९५ दरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सभासद झाले. त्यांना सन २००५ मध्ये माहूर येथील एका आक्रमक आंदोलनात हद्दपार करण्यात आले होते. त्यांच्या सोबत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांवर ही कारवाई झाली होती. त्यांना आणि त्यांच्या सहकारी पुढाऱ्यांना नांदेड येथील मध्यवर्ती कारागृहात देखील रहावे लागले. हद्दपार असल्यामुळे त्यांच्या कुटूंबातील सर्व सदस्यांनी त्यांना नांदेड मध्ये राहण्याचा आग्रह केला. तो माहूर येथील खटला तब्बल १२ वर्षे चालला आणि ज्यावेळी निकाल लागला तेव्हा सर्वांना निर्दोष सोडण्यात आले.

नांदेड मध्ये राहायला आल्यावर देखील गडी शांत राहिला नाही. सन २००६ मध्ये पुन्हा नांदेड येथील आंदोलनात अडकला व आपल्या २५ ते ३० सहकाऱ्या सोबत जेल मध्ये गेला. ती घटना आज ही अंगावर काटा आणणारी आहे. शालिनी पाटील आणि छावाचे जावळे पाटील यांनी राज्यभर परिषदा घेत संविधान व डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या विरोधात गरळ ओकण्याचे कार्य सुरु केले होते. नांदेड मध्ये देखील तसे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बेकायदेशीर रॅलीला काही आंबेडकरवादी व मार्क्सवादी कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. आणि ती सामाजिक सलोखा बिघडवीणारी रॅली रोखली होती.नंतर नांदेड शहरात दंगल सदृश वातावरण निर्माण झाले. एस.पी.फतेहसिह पाटील व इतरांना दुखापत झाली व शांततेत आंदोलन करणाऱ्या या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना जेल मध्ये टाकले.
तो खटला आजपर्यंत जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु आहे.

विविध आंदोलने अनेक गुन्हे दाखल होत गेले मात्र चक्र काय अजून थांबायला तयार नाही. त्यांनी २००६ च्या नांदेड बॉम्ब ब्लास्टची सीबीआय चॊकशी तेव्हा लावली होती. आणि नंतर अनेक ठिकाणी झालेल्या बॉम्ब स्फ़ोटाचे नांदेड कनेक्शन समोर आले होते. २००६ मध्ये त्यांनी डीवायएफआय च्या वतीने पहिल्यांदा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय व मनपा समोर पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान मिळावे म्हणून आंदोलन केले आणि तत्कालीन जिल्हाधिकारी राधेशाम मोपलवार यांनी पुढाकार घेत प्रत्येकी पीडितांना सानुग्रह अनुदानापोटी ५ हजार रुपये रोख व रेशन किट देण्याचे कार्य केले होते.
सन २००९ मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना भोकर विधानसभा मतदार संघातील त्यांचा निवडणूक खर्चाचा तपशील अल्पवधित मिळवून रेमन मेगासेसे पुरस्कार विजेते (आशियाचा नोबेल)आंतर राष्ट्रीय पत्रकार तथा द हिंदू चे ग्रामीण आवृत्तीचे संपादक पी.साईनाथ यांना उपलब्ध करून देत देशभर खळबळ मजविली होती. नंतर ‘पेड न्यूज’ कायदा देखील चर्चेत आला होता. त्यांना काही मन दुखावलेल्या व्यक्ती कडून धमकवण्याचा प्रयत्न देखील झाला परंतु ते किंचितही डगमगले नाहीत. त्यांनी विनाशुल्क मिळालेले शस्त्र धारी पोलीस संरक्षण देखील नम्रपणे नाकारले कारण त्यांच्या पक्षाच्या तत्वात ते बसणारे नव्हते.
२०१० मध्ये एका अडचणीच्या वेळी कॉ.गायकवाड यांनी थेट पी.साईनाथ यांना फोन करून जीवाला धोका असल्याची माहिती दिली होती. तेव्हा साईनाथ यांच्या सोबत सोनिया गांधी व राहुल गांधी असल्याचे त्यांनी सांगितले व आता लगेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्यास सांगतो असे ते म्हणाले होते. आणि नांदेड येथील तेव्हाच्या प्रमुखांना फोन देखील आला होता. पी.साईनाथ हे माजी दिवंगत राष्ट्रपती यांचे नातू असल्यामुळे त्यांचे व गांधी घराण्याचे सलोख्याचे संबंध आहेत. कॉ. गायकवाड यांच्या संकल्पनेतून व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी संवेधानिक मार्गाने लढा देऊन नांदेड शहरातील ९ हजार लोकांना १० हजार रुपये प्रमाणे ९ कोटी रुपये अतिवृष्टीचे अनुदान २०२३ मध्ये मिळवून दिले असून २०२४ मध्ये साधारणतः १५ कोटी पेक्षा अधिक निधी पूरग्रस्तांसाठी खेचून आणला आहे.
नांदेड जिल्ह्यातील दुयम निबंधक कार्यालयातील मुद्रांक व रजिस्ट्री घोटाळा,चमकोगिरी साठीचा पोलीस संरक्षण घोटाळा,पेड न्यूज आर्टिकल, रेल्वे मजदूर आंदोलन,विद्यापीठातील सफाई कामगारांचे आंदोलन, रेणुका देवी संस्थान कर्मचाऱ्यांचे आंदोलन,वझरा गावठाण विस्तार वाढ आंदोलन, तृतीयपंथी यांचे आंदोलन,असंघटित क्षेत्रातील कामगारांचे आंदोलन, घरेलू कामगारांचे आंदोलन,पीडित आदिवासी, दलित आणि अल्प संख्याकांचे आंदोलने योग्य पद्धतीने हाताळून यशस्वी पणे लढा देत यश मिळविले आहे.
प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांच्या सोबत त्यांचे घनिष्ठ संबंध जरी नसले तरी जोपर्यंत प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत लढा देण्याची त्यांची जिद्द आणि तळमळ हेच एकमेव हत्यार त्यांच्याकडे आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
आपल्या वडिलांच्या विचाराने प्रेरित झालेले कॉ.गंगाधर गायकवाड हे नांदेडचे निडर व अवलिया म्हणून चर्चेत आहेत.
त्यांना कुणी संघर्षशील नेता, कुणी ढाण्या वाघ तर कुणी मुलुख मैदानी तौफ म्हणतात हे देखील सार्थक ठरणारेच आहे. म्हणून त्यांचे घोषवाक्य आहे. “जिथे सर्व पर्याय संपतात, तिथे आमचा शोध सुरु होतो!” त्यांनी मागील दीड वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरु केलेले साखळी उपोषण अजून सुटले नाही ही खंत स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्षी आहे. त्यांना यश येवो आणि आंदोलनाची सांगता होवो हिच प्रशासनाकडून अपेक्षा.
लेखक …कॉ.जयराज गायकवाड, डीवायएफआय, नांदेड. मो.+917448158032