नांदेड| केंद्रीय मंत्रिमंडळाने छत्रपती संभाजीनगर – परभणी (१७७ कि.मी.) लोहमार्ग दुहेरी करणाला जच्या (दिनांक ३१/०७/२०२५) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली.यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी सतत पाठपुरावा केला होता.

छत्रपती संभाजीनगर-परभणी लोहमार्ग दुहेरीकरण मराठवाड्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण मराठवाड्याला मुंबई, पुणे, नाशिक तसेच उत्तरेत जाण्यासाठी हा मार्ग महत्वाचा आहे. या लोहमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी मिळाल्याने मराठवाड्यातील रेल्वे प्रवास आगामी काळात वेगावान होणार आहे. आज जरी या लोहमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी मिळाली असली तरी त्याची पायाभरणी मात्र नि:शंकपणे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. मराठवाड्यातील परभणी-मनमाड (२९१ कि.मी.) लोहमार्ग दुहेरीकरणाची कित्येक वर्षांपासून मागणी होती.

रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री असताना त्यांनी परभणी-मनमाड ह्या मार्गाची फोड करून अंकाई (मनमाड)-छत्रपती संभाजीनगर (९८ कि.मी.) साधारणपणे एक हजार कोटी रुपयांच्या आतील काम अंब्रेला योजनेतून मंजूर करून घेऊन भरभरून निधी देऊन प्रत्यक्ष सुरू करून घेतले. आता त्याचाच पुढचा टप्पा छत्रपती संभाजीनगर-परभणी लोहमार्ग दुहेरीकरणाला मंजुरी मिळण्यात झाला. खा. डॉ. अजित गोपछडे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रवनीत सिंह बिट्टू यांच्या सोबत सातत्याने पाठपुरावा केला त्याची परिणती मंजुरी मिळण्यात झाली. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह मराठवाड्यातील रेल्वे संघटना, रेल्वे अभ्यासक, पत्रकार शंतनु डोईफोडे आदिंचे सामुहिक प्रयत्न आज सफल झाले.


खासकरून आज नांदेड भूषण स्व. सुधाकरराव डोईफोडे यांचीही आठवण होते. त्यांचे स्वप्न आज साकार झाले असे म्हणता येईल. मराठवाड्यातील सर्व नागरिक, रेल्वे संघटना, रेल्वे अभ्यासक, लोकप्रतिनिधी ह्यांच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंह बिट्टू, रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचे आभार मानतो, अशी भावना खा. डॉ अजित गोपछडे यांनी माध्यामांशी बोलताना व्यक्त केली.


