नवी दिल्ली| शेतकर्यांच्या दैनंदिन कामात सुधारणा घडवून कृषी उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी जलवायु अनुकूल कृषि तंत्रांचे शेतकर्यांना समर्पक प्रशिक्षण दिले जाणे अत्यावश्यक असून त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत खा. डॉ.अजित गोपछडे यांनी सभागृहात मांडले.
भारतीय कृषि अनुसंधान परिषद (आयसीएआर) च्या संशोधनविषयक चर्चेत सहभाग घेताना खा.डॉ.अजित गोपछडे यांनी स्पष्ट केले की,आयसीएआरच्या माध्यमातून शेतकर्यांच्या हितासाठी सरकारकडून घेतले जाणारे हे पाऊल, ग्रामीण अर्थव्यवस्थेत नवीन ऊर्जा निर्माण करेल आणि भारतीय कृषि क्षेत्रातील अडचणींवर मात करण्यास मदत होईल. यावेळी खा.डॉ.गोपछडे यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री भागीरथ चौधरी यांनी सांगितले की, भारतीय कृषि अनुसंधान परिषद (आयसीएआर) च्या संशोधन प्रयत्नांना सुधारण्यासाठी आणि त्यांचा पुनरुद्धार करण्यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञ कृषि तंत्रज्ञांसह उच्चाधिकार समित्यांची स्थापना करण्याचे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
पुढे ते म्हणाले, आयसीएआरच्या संशोधन कार्यक्रमांची आणि परिणामांची वेळोवेळी समीक्षा करण्यासाठी प्रतिष्ठित तज्ज्ञांची समिती गठित केली जाते. शेवटची अशी उच्चाधिकार समिती 2017 मध्ये स्थापन करण्यात आली होती, ज्यांनी आयसीएआरच्या 12व्या योजना कालावधीतील विविध योजनांची समीक्षा केली होती. याशिवाय केंद्र सरकारच्या नेतृत्वाखालील आयसीएआरने शेतकरी समुदायांमध्ये असलेल्या अडचणींवर राज्य सरकारांकडून अधिकृतपणे प्रतिक्रिया मागवली आहे. त्यासाठी, आयसीएआरने आठ क्षेत्रीय समित्या तयार केल्या आहेत, ज्यांच्या नियमित बैठकीत राज्य सरकारच्या अधिकार्यांबरोबर आयसीएआरच्या संशोधन संस्थांचे प्रतिनिधी देखील सहभागी होतात. या बैठकीत शेतकर्यांनी अनुभवलेल्या समस्यांवर चर्चा केली जाते आणि त्यावर संशोधनात्मक उपाययोजना केल्या जातात.
राज्यमंत्र्यांनी याबाबत विस्तृत माहिती दिली, ते म्हणाले, राज्यनिहाय जल, वातावरण आणि भूभौतिकीय परिस्थितींनुसार विशेषतः अनुकूल संशोधन कार्य करण्यासाठी आयसीएआरची व्यापक योजना आहे. आयसीएआरद्वारे, कृषी पारिस्थितिकीय क्षेत्रांचे विश्लेषण करुन, मातीच्या प्रकारांचा अभ्यास करुन, विविध राज्यांमध्ये योग्य त्या पीक उत्पादनासाठी तंत्रज्ञान विकासाच्या संशोधनावर भर दिला जातो. राज्य कृषि विद्यापीठांसोबत सहकार्य करून, कृषी पद्धतींमध्ये टिकाऊ सुधारणा करण्यासाठी अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प राबवले जातात.
याशिवाय, जलवायु अनुकूल कृषि तंत्रांच्या विकासावर भर देऊन, शेतकर्यांना जल व्यवस्थापनाच्या कुशल पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाते. स्थानिक वातावरणीय तणावांना तोंड देण्यासाठी टिकाऊ कृषि तंत्र विकसित करुन प्रोत्साहन दिले जाते. तसेच, कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके) जिल्हास्तरीय संशोधन, प्रशिक्षण आणि विस्तार केंद्र म्हणून कार्य करतात. त्यांच्या मार्फत शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करुन देण्यासाठी अग्रिम पंक्ति प्रदर्शन, ऑन-फार्म परीक्षण, आणि शेतकर्यांपर्यंत तंत्रज्ञानाचे प्रभावी हस्तांतरण करण्यासाठी विविध कार्यशाळा आणि कार्यक्रम आयोजित केले जातात.