नांदेड| इतिहासाच्या कुशीत विसावलेल्या पाटणूरच्या ‘आपरंपार’ महाराज गडावर आता निसर्गाची सुवासिक सजावट घडत आहे. गडाच्या दोन्ही बाजूने तब्बल दोन किलोमीटर लांब सोनचाफ्याच्या झाडांची भिंत उभारण्यात आली असून, या फुलांच्या दरवळाने गडाभोवतालचे वातावरण अधिक पवित्र, निसर्गसुंदर आणि भावस्पर्शी बनणार आहे. यातून पाटणूरच्या सत्याग्रही जंगलात आता सुगंधी अनुभूती मिळणार आहे.

हा अनोखा उपक्रम ‘आपरंपार गड संस्थान पाटणूर’ यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला असून, यावेळी पुढील पाच वर्षांसाठी गडाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र भूषण व्यंकटेश जोशी यांच्या सहकार्यातून सोनचाफा वृक्षसंवर्धन उपक्रम मार्गी लागला. गावातील तरुणांच्या संकल्पनेतून आणि ‘सेवा समर्पण परिवार’ या संस्थेच्या पुढाकारातून मोठ्या प्रमाणात श्रमदान करण्यात आले. सेवा समर्पणचे मान्यवर पदाधिकारी सकाळी ६ वाजता गडावर उपस्थित झाले होते.

या सोनचाफा भिंत उपक्रमाचा शुभारंभ ज्येष्ठ समाजसेवक प्रा. राजाराम वट्टमवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने, त्यांच्याच हस्ते करण्यात आला. या वेळी लोकप्रिय आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी उपस्थितांचे सत्कार करत, त्यांनी गडाच्या विकास व संवर्धनासाठी ११ लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली. “गडाचे नैसर्गिक पावित्र्य राखा; मी नेहमी तुमच्यासोबत आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमास परमपूज्य रेवणसिद्ध आया महाराज, परमपूज्य गोपाळ महाराज, नरेंद्र चव्हाण, विठ्ठल पावडे, अशोक घोरबांड, बळवंत म्हस्के, नियोजन गुरु शिवाजी गावंडे, रमेश चित्ते, दिलीप माहूरे, अविनाश कदम, चंदा रावळकर, विठ्ठल फुलारी, नरसिंगा बतलवाड, प्रा. राजाराम वट्टमवार, पत्रकार ज्योती सरपाते, पत्रकार दीपक मठपती, दिगंबर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.


गडावरील पाण्यासाठी विहीर तयार करण्यासाठी जमीन देणारे नरसिंगा बतलवाड, तसेच स्वखर्चाने विहीर करणारे परमपूज्य गोपाळ महाराज यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. खा. अशोकराव चव्हाण व मा. खा. रवींद्र चव्हाण यांनी गडावर पाणी नेण्यासाठी विशेष मदत केली, अशी माहिती संयोजकांकडून देण्यात आली. गडसंवर्धन, पर्यावरणरक्षण आणि पर्यटनवृद्धी या तिन्ही बाबींना एकत्र साधणारा हा उपक्रम महाराष्ट्रातील इतर गडांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान पाटील यांनी तर आभारप्रदर्शन अरविंद देशमुख यांनी केले.


