हदगाव, शेख चांदपाशा| देशात भाजपची सत्ता आल्यानंतर अनेक महत्त्वाचे बदल झाले असून अनेक योजना आहेत याची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. असे प्रतिपादन भाजप नांदेड जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख यांनी केले.


शनिवारी हदगाव येथील संत रोहिदास सभागृहात भाजप तालुका व शहर मंडळाच्या ” संवाद” बैठकीत ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून माधवराव पाटील उच्चेकर यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्ष देशमुख म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षांत देश सुरक्षित व प्रगतिशील बनला आहे. केंद्र सरकारचा प्रयत्न आहे की डॉक्टर, अभियंते, शिक्षक, व्यापारी तसेच पक्षाचे कार्यकर्ते हे थेट जोडले जावेत अशी अपेक्षा व्यक्त त्यांनी केली.

भाजपा अध्यक्ष देशमुख यांनी काँग्रेसच्या काळातील परिस्थितीची आठवण करून देताना सांगितले की, पूर्वी सामान्य माणसाला घरासाठी शासकीय कार्यालयांचे अनेक फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, मोदी सरकारच्या काळात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोणतीही जात, धर्म, पंथ न पाहता गरजू नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद तसेच महानगर पालिकांच्या माध्यमातूनही गरजूंना घरे सहज मिळत आहेत.


राज्यातील वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर २०२७ पर्यंत २७,००० मेगावॅट वीज निर्मितीचा ध्यास सरकारने घेतला आहे. तसेच या काळात नागरिकांना दरमहा ३०० युनिट वीज मोफत देण्याची योजना असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष सहकार्य लाभणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. या बैठकीस डॉ. तावडे, अॅड. शेखर पाटील सचिन पांडे, नारायण कदम, नंदकुमार वारकड, भाऊराव डोरले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भाजप तालुका अध्यक्ष बाळा पाटील, शिरीष मनाठकर, बाला प्रसाद मुदंडा, उमाकांत भोरे यांच्या सौजन्याने करण्यात आले होते.

या संवाद बैठकी दरम्यान काही स्थानिय पत्रकारांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्याकडे आगामी जिल्हा परिषद, नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढणार का..? महायुतीसोबत याची विचारणा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र,कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी त्यांच्या भोवती गर्दी केल्याने पत्रकारांना त्यांच्याशी थेट संवाद साधता आला नाही. अध्यक्ष देशमुख यांनी स्थानिक पत्रकारांसाठी वेळ राखून ठेवला होता.

