नांदेड| फॉरेस्ट खात्याच्या विरोधात १८ ऑगस्ट रोजी मोर्चा काढल्याचा राग मनात धरून दलित कास्तकारांच्या शेतात १९ ऑगस्ट रोजी खड्डे खोदण्याचा अडमुठेपणा वन विभागा मार्फत होताना दिसत आहे.


नांदेड जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडालेला असताना बाचोटी कॅम्प ता. भोकर येथील वन रक्षक शिवाजी केंद्रे यानी दलित लोकांच्या शेतात जेसीबीने खड्डे खोदण्याचा विडा उचललेला दिसतो आहे. उप वन संरक्षक श्री केशव वाबळे यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही होत असून हे प्रकरण आता मंत्रालयीन स्तरावर गेले आहे.


जिल्ह्यात लाखो हेक्टर जमीन अनेक सवर्ण शेतकऱ्यांच्या ताब्यात असून ५० ते ६० वर्षांपासून पट्टे झालेले नाहीत. परंतु नेमक्या दलित कुटुंबियांना हेरून त्यांच्या ताब्यातील शेतात खड्डे करण्याचा सपाटा वन रक्षक शिवाजी केंद्रे व परीक्षेत्र अधिकारी रासने यानी लावला आहे. मौजे कोल्हा ता.मुदखेड येथे वन रक्षक असताना केंद्रे याने दलित शेतकऱ्यांच्या ताब्यातील शेतात खड्डे खोदले आहेत.हा सर्व प्रकार जातीयद्वेष्यातून घडत असून पीडित शेतकऱ्यांनी सीटू कामगार संघटनेचे सभासदत्व स्वीकारून संघर्ष सुरु केला आहे.


१८ ऑगस्ट रोजी धोधार पावसात सीटू च्या नेतृत्वाखाली दीड किलोमीटर आंतर पूर्ण करीत कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्या पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मजूर असलेल्या शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला होता. मोर्चा काढल्याचा राग मनात धरीत वन परीक्षेत्र अधिकारी रासने आणि वन रक्षक केंद्रे यानी १९ ऑगस्ट रोजी बाचोटी कॅम्प येथे जेसीबी मशीन नेऊन खड्डे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रोजनंदारी कामगार मेकाले याच्या मार्फत जेसीबी शेतात नेण्यात आली आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांना सर्व हकीगत सांगितल्यावर कार्यवाही तात्पुरती थांबविली आहे परंतु भविष्यात धोका होण्याची शक्यता असल्यामुळे व जातीयद्वेष्यातून कार्यवाही होत असल्यामुळे सर्वांवर ऍट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस , वन मंत्री ना.गणेश नाईक व पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे प्रत्यक्षात मुंबई येथे जाऊन संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
अंदाज पत्रके डावलून बोगस कामे दाखवून करोडो रुपयांची अफरतफर करणाऱ्या वन अधिकाऱ्यांनी लाल बावट्याच्या नादी लागू नये अन्यथा सळो की पळो केल्याशिवाय राहणार असा इशारा मुंबई मंत्रालयातून कॉ. गंगाधर गायकवाड यानी दिला आहे. संबंधितावर जोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाहीत तोपर्यंत लढा लढला जाईल असे सीटू संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

