उस्माननगर ( माणिक भिसे) मागील महिनाभरापासून जिल्ह्यात मुसळधार पावसासह वीजांचा कडकडाट व ढगफुटी सदृश्य परिस्थिती सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले, तलाव व विहिरी तुडुंब भरून वाहत असून पुरस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी विशेषतः मुलाबाळांची काळजी घ्यावी, नदी-नाल्यावर किंवा विहिरी-तलावाकडे त्यांना जाऊ देऊ नये, असे आवाहन उस्माननगर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सपोनि संजय निलपत्रेवार व ग्राम महसूल अधिकारी हिवंत पाटील यांनी केले आहे.


पूरस्थितीमुळे शेतीपिकांचे व जनजीवनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, हळद, मुग-उडीद, भाजीपाला यासह अनेक पिकांचे होत्याचे नव्हते झाले आहे. शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत.

दरम्यान, तरुणांमध्ये नदी-नाल्यावर उभे राहून फोटो व सेल्फी घेण्याची स्पर्धा सुरू असते. परंतु अशा ठिकाणी जाऊन फोटो काढणे धोकादायक असून जीवावर बेतू शकते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मोबाईलवर रील्स बनविण्यापेक्षा तरुणांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी सुचवले.


हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नये. वाहत्या पाण्यातून किंवा जोरदार प्रवाहातून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन पोलिस व महसूल प्रशासनाने केले आहे.


