‘A helping hand’ ; ‘एक हात मदतीचा’ : खुशी सेवाभावी संस्थेचा पूरग्रस्तांना दिलासा शेकडो आपत्तीग्रस्तांना बबलू टेकाळे यांचा दिलासा

देगलूर l मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हसनाळ, भिंगोली, भेंडेगाव, रावणगाव, मारजवाडी,भासवाडी या गावांत पूरस्थिती निर्माण झाली. शेतमाल वाहून गेला, जनावरे दगावली, घरे उद्ध्वस्त झाली आणि शेकडो कुटुंबांवर संकट कोसळले.


अशा कठीण प्रसंगी खुशी सेवाभावी संस्था तातडीने पुढे सरसावली. संस्थेच्या वतीने रावणगावसह परिसरातील पूरग्रस्तांना शेकडो अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष एकनाथ (बबलू) टेकाळे यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी केली. पूरग्रस्तांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “गावातील परिस्थिती अतिशय भीषण आहे. अनेक कुटुंबांचे संसार वाहून गेले असून त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. अशा वेळी प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे.”


बबलू टेकाळे यांनी याआधीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सणासुदीच्या काळात गरीब कुटुंबांना मदत, तसेच कोणत्याही धर्म-जातीचा भेद न करता समाजासाठी कार्य हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.



पूरग्रस्तांना दिलासा देऊन त्यांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. संकटाच्या काळात मदतीचा एक हातही मोठा आधार ठरतो, हे त्यांच्या कार्यातून अधोरेखित झाले. या वेळी संपादक गजानन टेकाळे, पत्रकार शेख असलम, धनाजी देशमुख, बालाजी चंदावाड, शेखर कोठारे, अनिल कांबळे, गंगाधर उल्लेवार, दीपक पिंटू फुगारे, आदी उपस्थित होते.




