Accident insurance : शेतमजुरांनाही मिळणार अपघात विमा संरक्षण; मृत्यू झाल्यास कुटुंबाला २ लाखांची मदत

मुंबई/हदगांव/हिमायतनगर | राज्यातील शेतमजूर कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य सरकारने आता शेतमजुरांनाही अपघात विमा संरक्षण देण्याची घोषणा केली आहे. शेती काम करताना अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित शेतमजुराच्या कुटुंबाला २ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा महायुती सरकारने मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे.

राज्यात शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर ही मदत शेतमजुरांनाही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतमजूर कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी शेतमजुरांनाही अपघात विमा संरक्षण मिळावे, ही मागणी सातत्याने शासनदरबारी लावून धरली होती. नागपूर येथे २०२५ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी विधानसभेत हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करत शेतकऱ्यांप्रमाणे शेतीत राबणाऱ्या शेतमजुरांनाही संरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते.

शेतीतील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळते; मात्र त्याच शेतीत दिवसरात्र कष्ट करणारे शेतमजूर या संरक्षणापासून वंचित राहतात, ही बाब त्यांनी ठामपणे मांडली होती. त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत राज्य सरकारने शेतमजुरांच्या कुटुंबालाही २ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

याबाबत बोलताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर म्हणाले कि, “राज्यातील शेती व्यवस्थेत शेतकरी आणि शेतमजूर हे दोन्ही घटक तितकेच महत्त्वाचे आहेत. शेतमजुरांच्या कुटुंबावर एखादी दुर्घटना ओढवली तर त्यांना कोणताही आधार राहत नाही. शासनाने घेतलेला हा निर्णय दिलासादायक असून अपघातग्रस्त शेतमजुरांच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळणार आहे.”

ते पुढे म्हणाले की, शेतकरी आणि शेतमजूर हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह असून राज्यातील हजारो शेतमजूर कुटुंबांना याचा थेट लाभ होणार आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे राज्यातील शेतमजूर वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून ही मागणी शासनापर्यंत पोहोचवून ती मार्गी लावल्याबद्दल शेतमजूर बांधवांकडून सरकारसह आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button