हिमायतनगर, अनिल मादसवार| मृत्यूपूर्वी जर चित्त भगवंतात स्थिर असेल, तर आत्म्याला पुढील जन्माची आवश्यकता राहत नाही. गंगेचा जल, रामाचे नाम, संतसंग, आणि भगवंताचे चरणस्मरण हे जीवनाच्या शेवटी मुक्तीचे द्वार उघडतात. श्रीमद भागवत कथा (Shrimad Bhagwat Katha) हा ग्रंथ केवळ एक धार्मिक पुस्तक नाही, तो मानवाच्या संपूर्ण जीवनाचा जन्मापासून मोक्षापर्यंत आध्यात्मिक प्रवास सांगतो. श्रीमद भागवत म्हणते “मानवाचा खरा धर्म तोच की, जो भगवंतावर निःस्वार्थ भक्ती निर्माण करतो आणि ज्यामुळं आत्मा आनंदित होतो.” “प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार प्रत्येक गोष्ट आधीच लिहून ठेवलेली आहे” ही कल्पना भारतीय संस्कृतीत ‘प्रारब्ध’, ‘कर्म’ आणि ‘दैव’ या तत्त्वज्ञानाशी संबंधित आहे. असे विचार हभप.सारंग चैतन्यजी महाराज (Habap.Sarang Chaitanyaji Maharaj) यांनी मांडले.

वाढोणा येथील श्री परमेश्वर मंदिरात श्रीमद भागवत महापुराण कथेला दिनांक २७ रविवारपासून सुरुवात झाली. भागवताचार्य परमपूज्य विदर्भ केशव स्वामी सारंग चैतन्यजी महाराज यांच्या मधुर वाणीने भाविक भक्त मंत्रमुग्ध होत असून, पवित्र श्रावण मासातील पहिल्या कथेचा पहिला दिवस आनंदी आनंदात गेला. सात दिवसीय महापुराण कथेच्या उद्घाटन प्रसंगी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अध्यात्मिक वातावरणात रंग भरल्याचे दिसून आले. सारंग चैतन्यजी महाराज यांच्या श्रीमुखातून कथामृताची गंगा वाहू लागली आहे.

पहिल्या दिवशी सारंग चैतन्यजी महाराजांनी श्रीमद भागवताची महिमा, व्यासपिठाचे महत्त्व आणि धर्म, भक्ती, वैराग्य यांची सुरुवातीची रूपरेषा भाविकांसमोर मांडली. “जेव्हा मनात भक्ती असते, तेव्हा श्रीकृष्ण स्वतः पावन होण्यासाठी त्या भक्ताकडे येतो”, असे उद्गार महाराजांनी कीर्तनात काढले. साधूचे दोन प्रकार एक दुसऱ्याचं सध्या करणारे व दुसरा स्वतःच साधून घेणारे हे सांगत असताना “अवघाची संसार सुखाचा करीन” ही ओवी अत्यंत खोल आणि समर्पित भक्तीभाव व्यक्त करणारी आहे. भक्ती ही फक्त ध्यानधारणा किंवा मंदिरे यापुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या संपूर्ण जीवनशैलीत असावी. सारंग चैतन्यजी महाराजांच्या कीर्तनात हि ओवी अनेकदा येते. कारण महाराज जीवनातील प्रत्येक क्षेत्रात संतांची शिकवण रुजवण्याचे महत्त्व सांगतात.”भक्ती ही माणसाला फक्त वैराग्य शिकवत नाही, तर त्याचं जीवनही सुंदर बनवतं.”



श्रीमद भागवत कथा सप्ताह म्हणजेच सात दिवसांत सांगितली जाते यामागे काही धार्मिक, अध्यात्मिक आणि व्यावहारिक कारणे आहेत. भगवंताच्या लीलांचा, भक्तीचा आणि तत्वज्ञानाचा मंगलमय, पवित्र ग्रंथ म्हणजेच श्रीमद भागवत असून, श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले गीतेचे दिव्य ज्ञान आहे. “भागवत सप्ताह” म्हणजे शुकदेव ऋषींनी राजा परिक्षित यांना मृत्यूपूर्वी केवळ ७ दिवस शिल्लक असताना श्रीमद भागवत कथा सांगितली. त्या ७ दिवसांत परिक्षिताने सर्व काही सोडून केवळ भागवत कथेचे श्रवण केले आणि मोक्षप्राप्ती केली. हीच परंपरा पुढे “भागवत सप्ताह” या स्वरूपात चालू झाली असल्याचे स्वामीजी म्हणाले.

राजा परीक्षित (शिष्य) आणि श्री शुकदेवजी महाराज (गुरु) यांचा प्रश्नोत्तर रूपी संवाद
![]()
गुरूशिवाय भगवंताचा अनुभवही अशक्य आहे, कारण गुरूच आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जातो. सद्गुरूंचे सानिध्य असले तर जीवनाचा खरा अर्थ कळतो. देव खराच आहे तो रूपात (सगुण) आणि रूपविरहित (निर्गुण) दोन्ही रूपात आहे. “देव दिसत नाही, म्हणून खोटा असावा का?” पण वायू, प्रेम, विचारसुद्धा दिसत नाहीत तरी त्यांचं अस्तित्व मानतोच ना? देव हा अनुभवायचा विषय आहे, बघायचा नाही. श्रीमद भागवत कथा ग्रंथाचा मूळ आधार आहे राजा परीक्षित (शिष्य) आणि श्री शुकदेवजी महाराज (गुरु) यांचा प्रश्नोत्तर रूपी संवाद म्हणजेच भागवत आहे असेही स्वामीजी म्हणाले.
“अज्ञानरूपी पट्टी दूर करण्यासाठी तो जन्माला आला” हे वाक्य भगवंताच्या, संताच्या, किंवा सद्गुरूच्या अवताराचे खरे कारण सांगते. लौकिक म्हणजे “लोकाशी संबंधित”, अलौकिक म्हणजे “लोकांपलीकडचं”, म्हणजेच प्रेम हे लौकिक असू शकतं, पण भक्तीमय प्रेम राधेचं श्रीकृष्णावरचं प्रेम – अलौकिक असतं. “लौकिकात जगता जगता, अलौकिकाचे स्मरण ठेवले, तरच जीवन सार्थक ठरते.” भागवताला “अमर कथा” म्हंटले आहे. भागवत ही कथा भगवंताच्या लीला, भक्तांचे चरित्र, आणि आत्मज्ञान सांगते हे ज्ञान कधीही जुनं होत नाही असे संगत स्वामीजींनी पहिल्या दिवशीची कथा समाप्त केली. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष भक्तांनी उपस्थिती लावली होती.

