नांदेड | आता हवा बदलली आहे, नागरिकांचा कौल महाविकास आघाडीला आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये आपण सर्वांनी एकत्रित येवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष संघठन अधिक वाढवून खा.शरदचंद्र पवार यांचे विधानसभा निवडणुकीत हात बळकट करून नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू असे मत माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार नांदेड ग्रामीणची आढावा बैठक नुतन जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी दि.14 ऑगस्ट रोजी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केली होती यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.प्रदिप नाईक तर माजीमंत्री सुर्यकांता पाटील, माजीमंत्री माधवराव पाटील किन्हाळकर आणि नुतन जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम, प्रदेश प्रतिनिधी कल्पना डोंगळीकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, युवकचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, शहर अध्यक्ष रऊफ जमीनदार यांची उपस्थिती होती.


पुढे बोलतांना सुर्यकांता पाटील म्हणाल्या की, 10 वर्षाची रजा मंजूर करून मी स्वगृही राष्ट्रवादीत परतली आहे. पुन्हा शरदचंद्र पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचायचे आहेत. आता ते नेते भाजपमध्ये गेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादीला नांदेड जिल्ह्यात चांगले दिवस येणार आहेत. 4 ते 5 ठिकाणी राष्ट्रवादी विधानसभेच्या जागा लढविणार आहे. गटतट बाजूला सोडून आपण सर्व एकत्रित येवून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष वाढवायचा आहे. विधानसभेसाठी फार कमी कालावधी आहे त्यामुळे आता विधानसभेत राष्ट्रवादीची तुतारी वाजली पाहिजे असेही त्या म्हणाल्या.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवारचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर म्हणाले की, माझी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात प्रभावीपणे काम करणार आहे. कार्यकारणीचा विस्तार करण्यासाठी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तेथे नविन कार्यकर्त्यांना संधी देणार आहे. जिल्ह्यात सदस्य नोंदणी प्रभावी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवारचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम म्हणाले की, नांदेड शहराममधील विधानसभेच्या दोन्ही जागेची मागणी पक्षाने महाविकास आघाडीकडे करावी. समन्वयाने काम करणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर यांनी अत्यंत अभ्यासपुर्ण भाषण करून राष्ट्रवादीच्या जागा नांदेड जिल्ह्यात वाढणार असल्याचे सांगितले व आपण जोमाने काम करावे असेही त्यांनी सुचित केले. तर माजी आ. प्रदिप नाईक यांनी पक्षविरोधी कारवाया करणार्यांवर परस्पर पत्रक काढून इतर ठिकाणी बातमी प्रसिध्द करणार्यावर अध्यक्षांनी थेट कारवाई करावी. सर्वांच्या एकमताने ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचा आदेश हा अंतिम आदेश असतो हा सर्वांनी पाळायला हवा. असे म्हणत कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी बुथ कमिट्यांचे काम प्रभावी करावे. जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपरिषद यामध्ये निश्चितपणे कार्यकर्त्यांना स्थान दिले जाईल असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस प्रा.डी.बी.जांभरूनकर आणि प्रस्ताविक सुभाष गायकवाड यांनी केले. या आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारचे सर्वच सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीला प्रचंड प्रतिसाद दिसून आला.

