हिमायतनगर (प्रतिनिधी) सगरवंशीय राजा भगीरथांनी आपल्या वडिलांच्या सेवेसाठी अथक परिश्रम घेत विहीर खोदून पाणी पाजले, हा इतिहास प्रत्येक तरुणाने अंगीकारण्यासारखा आहे. आई-वडिलांची निस्वार्थ सेवा केली, तर स्वतःचा आणि येणाऱ्या पिढीचाही उद्धार निश्चित होतो, असा भावनिक व प्रेरणादायी उपदेश ह.भ.प. अजय महाराज महाजन यांनी केला.


हिमायतनगर तालुक्यातील कारला येथे बेलदार समाज बांधव सगरवंश मंडळाच्या वतीने मकर संक्रांत व राजा भगीरथ जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विदर्भरत्न ह.भ.प. अजय महाराज महाजन यांची कीर्तनसेवा आयोजित करण्यात आली होती.


कीर्तनातून समाजप्रबोधन करताना महाराज म्हणाले की, “संतांचे विचार घेऊन समाज चालला पाहिजे. संतांची विभूती ही महान असते. राजा भगीरथांनी वडिलांची सेवा करून इतिहास घडवला. आपण त्यांचे वंशज आहोत. केवळ जयंती साजरी करून थांबू नका, तर आई-वडिलांचा आधार बना.” समाजकार्य करताना अहंकाराचा त्याग करून अंतरीचा मळ दूर करावा, दुसऱ्याचे सुख हेच आपले सुख मानून आनंद वाटावा, असा संदेशही त्यांनी दिला.



या कीर्तनसेवेत मृदंगाचार्य पांडुरंग भिसे, सुरज माने, प्रथमेश एटलेवाड, गायनाचार्य भगवान महाराज गुंफलवाड, आनंद महाराज, भगवान महाराज, नारायण महाराज, मारोती महाराज आदींची उपस्थिती लाभली. जयंती सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती.


भाविकांनी राजा भगीरथांचे दर्शन घेतले असून, उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन बेलदार समाज बांधव सगरवंश मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमास ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

