कोल्हापूर| बुधवार पासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अनेक भाविक भक्त ठिक ठिकाणी देव दर्शनाला जात असतात, याच पार्श्वभूमीवर नववर्षाच्या पहिल्या दिवशी साडेतीन शक्तीपीठ पैकी एक शक्तिपीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांनी गर्दी केली होती.
सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर येणार नवीन वर्ष सुख समृद्धी व आरोग्यदायी जावो अशी प्रार्थना करत अंबाबाई च्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठया रांगा लाऊन मंदिरामध्ये गर्दी केली असल्याचे पाहायला मिळाले आहे.
श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेशसह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. नवरात्रोत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावत असतात. सध्या वर्षभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. त्यातच नववर्षाच्या सुरूवातीला देवीचे दर्शन घेवून वर्षारंभाची सुरूवात भक्तीभावाने करण्याची भक्तांची इच्छा असते. त्यामुळे कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांचे प्रमाण वाढले आहे.
मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने मंदिर परिसरातील हॉटेल, भक्त निवास हाउसफुल्ल झाले आहेत. परगावाहून येणाऱ्या अंबाबाईच्या भक्तांसाठी देवस्थानकडून अन्नछत्राचीही मंदिरापासून जवळच सोय करण्यात आली आहे. भाविक याचाही लाभ घेत आहेत. नव वर्षाची सुरूवात देवदर्शनाने करण्यासाठी राज्यातील भाविकांनी महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी हजेरी लावली. पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात देवाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या यावेळी भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत होते.