
नांदेड| नांदेड जिल्ह्यात नुकत्याच खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून खरीप हंगामात बोगस बियाणे विकणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांमुळे शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात बियाण्याची उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.


अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी सरकार अर्थसहाय्य करणार का ? शिवाय शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्राच्या संचालकांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणार का ? (MLA Chikhlikar’s voice is raised in the Legislative Assembly for farmers whose seeds have not germinated) असा प्रश्न आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज पावसाळी अधिवेशनात अत्यंत पोटतिडकीने उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देत असताना राज्याचे कृषी राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले की, दोषी कृषी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल.

पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या कामकाजात लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न उपस्थित केला. शेतकऱ्यांची झालेली फसवणूक आणि त्यातून निर्णम होणारे परिणाम त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना त्यांनी सांगितले की , नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरण्या नुकत्याच झाल्या आहेत . परंतु जिल्ह्यात अनेक कंपन्यांकडून बोगस बियाण्यांची विक्री करण्यात आली. यामध्ये उत्तम , समृद्धी, परम महाबीज आणि इगत अशा कंपन्यांनी बोगस बियाणे विक्री केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या बियाण्याची उगवण झाली नाही. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एक हजार शेतकऱ्यांनी या अनुषंगाने कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या तर कृषी विभागाच्या सांगण्यानुसार ३२८ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या.


पैकी 85 शेतकऱ्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. वास्तविक बियाण्यांची उगवण झाली नसताना आता चौकशी काय करणार असा प्रश्न उपस्थित करत आ. चिखलीकर यांनी ज्या कंपन्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या कंपन्यांना काळया यादीत टाकून त्यांच्यावर कायमची बंदी घालावी. शिवाय ज्या शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे, त्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करावे . खते आणि बियाणे देण्यासाठी काही तरतूद करण्यात येणार का ? असा प्रश्न उपस्थित केला.

या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे कृषी राज्यमंत्री ऍड.आशिष जयस्वाल यांनी सांगितले की , शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याची तरतूद सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे या अनुषंगाने नव्याने विचार करण्यात येईल . सरकार सकारात्मक दृष्टिकोनातून ही शेतकऱ्यांचा विचार करेल . ज्या कंपन्यांनी बोगस बियाण्यांची विक्री केली . त्या कंपन्यांवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार कायम आहे असा विश्वासही राज्यमंत्री जयस्वाल यांनी आ.चिखलीकर यांच्या प्रश्नाला उत्तर देतना व्यक्त केला.



