मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर , जालना , बीड, धाराशिव ,लातूर तसेच नांदेड, हिंगोली व परभणी या आठही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याचे उघडकीस आले आहे. संपूर्ण मराठवाड्यात पाच-दहा नव्हे तर तब्बल ३१ कोटींची वीज चोरी उघडकीस आली आहे. मागील आर्थिक वर्षातील एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत महावितरणने ही वीज चोरी उघडकीस आणली. विशेष म्हणजे मराठवाड्यातील संभाजीनगर शहरात सर्वाधिक ग्राहक हे चोरून वीज वापरणारे निघाले. तसे पहिले तर संपूर्ण मराठवाड्यातच वीजचोर मुजोर झाले आहेत. महावितरण ने २८ कोटी ७९ लाख रुपये दंडाची रक्कम या वीज चोरट्यांकडून वसूल देखील केली आहे. एकीकडे नियमित वीज बिल भरणारे ग्राहक मुकाट्याने दरवाढ सहन करतात व विजेची बिले नियमित भरत असतात. परंतु त्याउलट मोफत व चोरून वीज वापरणारे आजही तेवढ्याच दिमाखात व फुकटात वीज चोरीचा फायदा लाटत आहेत. अशा वीज चोरट्यांवर कुठे ना कुठे कडक व दंडासह शिक्षा देखील होणे तेवढेच गरजेचे आहे. अन्यथा मराठवाड्यात हा प्रकार काही थांबणार नाही, हे देखील तेवढेच खरे आहे.

मराठवाड्यात ३१ कोटींची वीज चोरी उघडकीस आली, ही धक्कादायक बाब असली तरी यापेक्षा आणखी कितीतरी वीज चोरटे आजही उथळ माथ्याने फिरत आहेत. वीज चोरट्यांना शोधून त्यांच्याकडून २८ कोटी ७९ लाख रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडळात १५३३ वीज ग्राहकांनी चोरी केल्याचे उघडकीस आले. त्यापैकी संभाजीनगर शहरात ७४४ तर संभाजीनगर ग्रामीण भागात ३४९ व जालना जिल्ह्यात ४४० वीज चोरट्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली . महावितरणने संभाजीनगर परिमंडळात १४ कोटी २४.३९ लाख रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली . छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने ही माहिती देण्यात आली.

मराठवाड्यातील आठ जिल्हयात एप्रील २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षात वीज चोरांविरुद्ध धडक मोहिम राबविण्यात आली होती. यामध्ये ४,६९८ वीज मिटरची तपासणी करण्यात आली. यात ३,७०४ मिटरमध्ये वीज चोरी आढळून आली. ४,१७,२१,३४४ युनिट वीज चोरी प्रकरणी ३१ कोटी ९७ लाख ११ हजार रुपयांच्या अनुमानित वीज बिल दंडाच्या रक्कमेची आकारणी करण्यात आली आहे. तर २८ कोटी ७९ लाख ४४ हजार रुपये वसूल करण्यात आले आहे. परंतु आणखी तीन कोटी रुपयांच्या जवळपास रक्कम वीज चोरट्यांकडून वसूल करणे बाकी आहे. खरे पाहिले तर विजेची चोरी व्हायलाच नको होती. चोरी झाली असेल तरी याला जे कोणी जबाबदार अधिकारी असतील त्यांना यासाठी काही ना काही दंड देखील लावणे तेवढेच गरजेचे आहे. जेणेकरून सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना देखील जरब बसेल. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी कुठे ना कुठे दुर्लक्ष केले म्हणून हा प्रकार घडला याला देखील नाकारले जाऊ शकत नाही. शासनाचा गले लठ्ठ पगार घेणारे अधिकारी व कर्मचारी हे देखील कुठे ना कुठे या प्रकरणाला तेवढेच दोषी आहेत. यादृष्टीनेही याकडे पाहिले गेले पाहिजे.


मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नदिड, लातूर, धाराशिव व बीड जिल्ह्यात एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षात दक्षता व सुरक्षा अंमलबजावणी विभागामार्फत वीज चोरांविरुद्ध मोहीम राबविली. विद्युत कायदा २००३ नुसार कलम १२६ अंतर्गत शेजाऱ्याकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुसऱ्या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे याचा समावेश होतो. तसेच कलम १३५ मध्ये मिटरची छेडछाड करणे, आकडा टाकून विजेचा वापर करणे, सर्व्हिसवायर टॅप करणे व कलम १३८ मध्ये महावितरणचे मिटर, वायरसह इतर वस्तू चोरी करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. वीज चोरी पकडण्याची मोहीम काही ठराविक काळापूरतीच चालविण्यात आली . यापुढेही सदरील मोहीम चालू राहिली असती तर कदाचित हा आकडा दुपटीने वाढला असता अशी कबुली एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

अनधिकृत विजेचा वापर करू नये, अनधिकृतपणे विजेचा वापर करताना आढळून आल्यास विद्युत कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेवूनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. आगामी काळात वीज चोरांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वीज चोरी शोध मोहीम राबविणे गरजेचे आहे. लातूर परिमंडळातील बीड जिल्ह्यात २७९ चोरीचे वीज ग्राहक आढळून आले . तर धाराशिव जिल्ह्यात २५१ व लातूर जिल्ह्यात ३६८ वीज चोरटे तपासणी पथकाच्या हाती लागले. नांदेड परिमंडळ अंतर्गत नांदेड जिल्ह्यात ३१३ वीज चोरटे सापडले. हिंगोली जिल्ह्यात २७१ वीज चोरट्यांना शोधण्यात पथकाला यश आले . तर परभणीत मात्र सर्वाधिक ६८९ वीज चोरटे आढळून आले. लातूर परिमंडळात ९ कोटी २५ लाख रुपयांची वीज चोरी उघडकीस आली. तर नांदेड परिमंडळात आठ कोटी ४६ लाख रुपयांची वीज चोरी उघडकीस आली.
वीज चोरी करणारे ग्राहक केवळ मराठवाड्यातच आहेत , असे नव्हे. संपूर्ण राज्यात व देशभरात असे वीज चोरटे नक्कीच असणार. परंतु त्यांचा शोध घेण्यासाठी एक मोठी यंत्रणा कार्यान्वित करणे तेवढेच गरजेचे आहे. कारण एकीकडे राजकारणी मंडळी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन देतात. तर दुसरीकडे नियमित विजेचा भरणा करणारे ग्राहक मुकाट्याने वीज बिल भरत असतात. परंतु समाजात अशी काही मंडळी आहे, जी विजेची चोरी करून फुकटात हा फायदा लाटत आहेत. अशा वीज चोरांना शोधणे महावितरणच्या समोर एक मोठे आव्हान ठरणार आहे. दुसऱ्यांदा वीज चोरी करणाऱ्यांचा वीजपुरवठा किमान तीन महिने कायमस्वरूपी बंद केल्यास विजेची चोरी नक्कीच रोखली जाणार आहे . परंतु असे कठीण निर्णय घेत असताना अधिकाऱ्यांना तेवढी मदत, मानसिक शक्ती किंवा वरिष्ठांचा पाठिंबा मिळाला तरच या सर्व बाबी शक्य आहेत.
लेखक…..डॉ. अभयकुमार दांडगे, मराठवाडा वार्तापत्र, abhaydandage@gmail.com

