नांदेड| केंद्र सरकारची महत्वाकांक्षी उपक्रम असलेली भारत संचार निगम (बीएसएनएल) ही कंपनी सध्या विविध समस्यांतून जात आहे. या सर्व समस्या दूर करून बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी आपण आवश्यक ते सर्व प्रयत्न करू, असे आश्वासन खा.डॉ.अजित गोपछडे यांनी अधिकार्यांच्या बैठकीत दिले.
बीएसएनएलचे विभागीय अभियंता एन.जे सूर्यवंशी, उपविभागीय अभियंता पी.एन.पडघणे , अधिकारी सुनील हिवरे आदींनी खा.डॉ.अजित गोपछडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेवून त्यांना बीएसएएनएलचे सीमकार्ड सुपूर्द केले. त्याप्रसंगी झालेल्या चर्चेत खा.डॉ.अजित गोपछडे यांनी कंपनीच्या विविध समस्या जाणून घेतल्या.
इतर खाजगी कंपन्यांच्या तुलनेत अनेक गावांमध्ये बीएसएनएल टॉवर उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना बीएसएनएलच्या कमी दरातील सेवापासून वंचित रहावे लागत असल्याचे अधिकार्यांनी सांगितल्यानंतर अशा दूर्गम भागात बीएसएनएल टॉवर लवकरात लवकर उभारावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.त्यासाठी दूरसंचार मंत्रालयाकडे आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. जनतेच्या हितासाठी नवीन टॉवरची आवश्यकता आहे.
बीएसएनएलच्या सर्व समस्या सोडवून वेळोवेळी या सरकारी कंपनीला आवश्यक ती मदत केली जाईल, सद्यस्थितीत खाजगी कंपन्यांकडून भरमसाठ दरवाढीचा फटका ग्राहकांना बसत आहे, त्यासाठी बीएसएनएलचे पुनरुज्जीवन गरजेचे असून इतर कंपन्यांपेक्षा बीएसएनएल ही सरकारी कंपनी सर्वात आघाडीवर रहावी यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार असल्याचे खा.डॉ.अजित गोपछडे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी स्वतः बीएसएनएलच्या सीमकार्डसह इंटरनेट, वायफाय व इतर नेटवर्क सुविधा उपलब्ध करून घेतली.बीएसएएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी व नेटवर्क विस्तारासाठी खा.डॉ.अजित गोपछडे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल उपस्थित बीएसएनएलच्या अधिकार्यांनी त्यांचे आभार मानले.