
हिमायतनगर, अनिल मादसवार| शेतीकामाला मजूर मिळत नसल्याने आधुनिक पद्धतीने शेती कामे केली जात आहेत. असे असताना आजही ग्रामीण भागातील शेतकरी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पारंपरिक पद्धतीने शेती कामे करताना दिसून येत आहेत. हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील शेतकरी पूर्वीप्रमाणे शेतीची मशागत, वखर पाळीचे कामे आपल्या सर्जा राजाला सोबत घेऊन करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.



यंदा पावसाला में महिन्यात सुरुवात झाली. त्यामुळे 15 दिवस अगोदर पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांची शेती कामे ठप्प झाली होती. मात्र दिनांक 01 जूनपासून पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी मशागत करण्यासाठी वेळ मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अगोदर शेतीची उन्हाळी मशागत केली. त्यापैकी अनेक शेतकऱ्यांना 15 दिवसाच्या मान्सूनपूर्व पावसाने पुन्हा एकदा मशागत करण्यास भाग पाडले आहे. एकूणच शेतीची अंतिम मशागतीची कामे जोरात सुरु असून, यंदा जून महिन्यात खरिपाच्या पेरण्या उरकतील अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना आहे.




