Friday, May 15

मंदिरांचे धन बँकेत जमा करण्याऐवजी जीर्ण मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी वापरा ! – गिरीश शहा, कार्यकारी विश्वस्त, समस्त महाजन संघ -NNL

गोवा| भारताच्या कानाकोपर्‍यात लाखो मंदिरे आहेत. मंदिरांनीच आपल्या संस्कृतीचे रक्षण केले आहे; मात्र सध्याच्या काळात मंदिरांत भाविकांकडून देवकार्यासाठी मिळणारे दान बँकेत जमाठेवीच्या रूपाने ठेवले जाते. यातून देवकार्यासाठी मिळालेले धन बँकेत पडून रहाते, त्याचा धर्माला काही उपयोग होत नाही. दुसरीकडे पडझड झालेल्या जीर्ण मंदिरांकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे भाविकांच्या दानाचा पैसा हा बँकेत पडून रहाण्याऐवजी जीर्ण मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी वापरणे आवश्यक आहे. हे पुनर्निर्माणाचे कार्य करतांना पुरातन मंदिरांची संरचना सुरक्षित राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘समस्त महाजन संघा’चे कार्यकारी विश्वस्त श्री. गिरीश शहा यांनी केले. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पाचव्या दिवशी ते ‘मंदिरांचे सुप्रबंधन’ यावर बोलत होते.

या प्रसंगी ‘मंदिराचे अर्थशास्त्र’ यावर बोलतांना श्री. अंकीत शहा म्हणाले, ‘‘विनामूल्य देण्याची पद्धती कार्ल मार्क्स याने रूढ केली आणि मतांच्या राजकारणातून ती वाढली. याउलट भारतीय अर्थशास्त्र मनुष्याला आत्मनिर्भर बनवते. सनातन धर्मामध्ये मंदिरांच्या अर्थकारणातून शिक्षणप्रणाली चालवली जात होती. मंदिरामधील अर्थव्यवस्थेवरून गावांची निर्मिती होत होती. भारतातील शिक्षणपद्धती मंदिराच्या अर्थकारणातून चालत होती. ऋषीमुनी अभ्यासक्रम निश्चित करत होते. मंदिरांची अर्थव्यवस्था नष्ट झाल्यामुळेच भारतात साम्यवाद आणि भांडवलशाही आली. त्यामुळे सनातन धर्माच्या पुनरुत्थानासाठी पुन्हा एकदा समाजाला मंदिरांवर आधारित अर्थव्यवस्थेचे ज्ञान देण्याची आवश्यकता आहे.

मंदिरातून हिंदूंना धर्मशिक्षण मिळाले पाहिजे ! – पू. प्रा. पवन सिन्हा गुरुजी, पावन चिंतन धारा आश्रम

Girish Shah मंदिरांचे धन बँकेत जमा करण्याऐवजी जीर्ण मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी वापरा ! - गिरीश शहा, कार्यकारी विश्वस्त, समस्त महाजन संघ -NNL

पुरोहितांनी मंदिरात येणार्‍या हिंदूंना टिळा लावण्यासमवेत त्यांना धर्माचे शिक्षणही दिले पाहिजे. असे झाल्यास त्यातून हिंदूंचा धर्माभिमान वाढून त्यांचे मनोबल वाढेल आणि सर्व संघटित होतील. सध्याच्या काळात हिंदु धर्माविषयी निधर्मींकडून केला जाणारा अपप्रचार खोडून काढण्यासाठी पुरोहितांकडून शास्त्राचे प्रामाणिक ज्ञान मिळणे आवश्यक आहे. मंदिरात जातांना काही नियम असले पाहिजेत. मंदिरात स्वच्छतेची सेवा केल्याखेरिज व्यक्तीची चेतना जागृत होऊ शकत नाही, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशातील ‘पवन चिंतन धारा आश्रमा’चे पू. प्रा. पवन सिन्हा गुरुजी यांनी केले.

या प्रसंगी माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख म्हणाले, ‘‘मंदिरांनी त्यांचे व्यवस्थापन सरकारच्या ताब्यात जाऊ नये यांसाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने विश्वस्तांनी ‘महाराष्ट्र सार्वजनिक ट्रस्ट अनिनियम १९५०’चे पालन करणे, विश्वस्तांनी विसंवाद होऊ नये यांसाठी प्रयत्न करणे, मंदिराचे व्यवस्थापन चांगले ठेवणे, मंदिरांनी त्यांचे अंदाजपत्रक वेळेत करणे, मंदिरांनी त्यांची अचल आणि चल मालमत्तेविषयी नोंदणी ठेवणे, अशा कृती करणे अपेक्षित आहे. या गोष्टींसमवेत भाविकांनी त्याच मंदिरांना दान द्यावे जी मंदिरे सरकारच्या ताब्यात नाहीत.’’

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने कांची कामकोठी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती आणि प.पू. गोविंददेव गिरीजी महाराज यांनी आशीर्वादरूपी संदेश पाठवला आहे. या वेळी पू. प्रा. पवन सिन्हागुरुजी यांच्या हस्ते सनातन संस्थेच्या ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ या गुजराती ‘ई-बुक’चे प्रकाशन करण्यात आले.

श्री. रमेश शिंदे,राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती,(संपर्क : ९९८७९ ६६६६६)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!