प्रत्येक गावात जल जीवन मिशन अंतर्गत नल जल मित्र; प्रकल्प संचालक नारायण मिसाळ यांची माहिती -NNL

नांदेड| जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्तीसाठी स्थानिक पातळीवर जल मित्रांची निवड सर्व ग्रामपंचायतींनी करण्याचे आवाहन जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.


प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावातील तीन कौशल्यांवर आधारित प्लंबर/गवंडी, मेकॅनिक/फिटर, इलेक्ट्रिशन/पंप ऑपरेटर प्रति 3 कौशल्य व्यक्ती याप्रमाणे एकूण 9 व्यक्तींची निवड करावी. निवड झालेल्या व्यक्तींना आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्यामुळे ते पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल व दुरुस्तीत सक्षम होतील. यासाठी ग्रामपंचायतीने 9 उमेदवारांचे नामनिर्देशन करावे, ज्यांमधून तीन कुशल व्यक्तींची अंतिम निवड केली जाईल. निवड झालेल्या 9 उमेदवार ग्रामपंचायतीच्या ठरावासह गट विकास विकास अधिकारी यांच्या मार्फत उमेदवाराचे आधार कार्ड नंबर, मोबईल नंबर, शिक्षण व अनुभवासह माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात सादर करणे आवश्यक असल्याचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ म्हणाले.

या उपक्रमाद्वारे गावपातळीवर पाणीपुरवठा योजनांची देखभाल अधिक कार्यक्षमपणे करण्यात येणार आहे. स्थानिक कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून तातडीने दुरुस्ती व देखभाल कार्य करता येईल, ज्यामुळे गावातील पाणीपुरवठा व्यवस्थेत सातत्य आणि गुणवत्ता राखली जाईल. यासाठी सर्व ग्रामपंचायतींना जल मित्रांच्या निवडीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन प्रकल्प संचालक नारायण मिसाळ यांनी केले आहे,





