हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर शहरात भटक्या व रोगग्रस्त कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या काही दिवसांत शाळकरी मुले तसेच काही नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या असून, त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळी व सायंकाळी शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुत्र्यांचा विशेष त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, शहरातील अनेक भागांत कुत्र्यांचे टोळके मुक्तपणे फिरत असून, त्यांच्यावर नियंत्रणासाठी प्रभावी मोहीम राबविण्याची गरज आहे. खाज, संसर्ग आणि संभाव्य रेबीजचा धोका लक्षात घेता तातडीने आरोग्यविषयक उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.


दरम्यान, नगराध्यक्ष रफिक सेठ व उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार यांनी जखमींची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी विशेष पथक नेमून पकड मोहीम, लसीकरण व निर्बीजिकरण यासारख्या उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

शहरातील विविध सामाजिक संघटनांनीही प्रशासनाने ठोस कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीची आणि दीर्घकालीन उपाययोजना काय असतील, याकडे हिमायतनगरकरांचे लक्ष लागले आहे.

