
नांदेड| नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात गावपातळीवर ‘कृषी अवजार बँक’ उभारण्यासाठी प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के, म्हणजेच कमाल २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.


या योजनेत उमेद व माविमद्वारे पुरस्कृत महिला बचत गट तसेच गावसंघ पात्र ठरणार असून, संबंधित गटात किमान १० सदस्य असणे आवश्यक आहे. यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून कृषी अवजार बँकेचा लाभ घेतलेल्या गटांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास निवड प्रक्रिया ऑनलाईन लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे.

निवड झालेल्या गटांना ट्रॅक्टर चलित अवजारे, बीबीएफ यंत्र, रोपणी व लावणी यंत्र, मल्चिंग मशीन, कम्बाइन हार्वेस्टर, फवारणी पंप आदी आधुनिक कृषी यंत्रसामग्री खरेदी करता येणार आहे. प्रकल्पाचा खर्च २० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास राष्ट्रीयीकृत बँकेकडून ७५ टक्के कर्ज घेणे बंधनकारक राहील.


इच्छुक संस्थांनी ५ एप्रिल २०२६ पर्यंत अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा नांदेड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.




