“गुलमर्गच्या सृष्टीसौंदर्यात हरवलेली ती अखेरची शांतता…”
सकाळी ७ वाजता, सर्व यात्रेकरू गुलमर्ग कडे जाण्यास सज्ज झाले. काश्मीरच्या सुंदर दऱ्या-खोऱ्यातील थंड व स्वच्छ वातावरण, सुचीपर्णी व चिनार वृक्षांची दाटी अंगावर अलगद फुलपाखरासारखी येऊन जाई. पहाटेच्या अल्लड हवेत त्या हिरवाईचा वास आणि पर्वतांचं मौन मंत्रपठण करत होतं… जसा ऊन वाढू लागला तसा थोडासा उकाडा जाणवू लागला,पण आमच्या AC गाड्यांमुळे त्याचा फारसा त्रास झाला नाही.

गुरु पौर्णिमा आणि छोले भटुरे
प्रवास चालू असताना मला भाजपा महानगर अध्यक्ष अमर राजुरकर यांचा मेसेज आला.”गुरु पौर्णिमे निमित्त सर्व भाजप पदाधिका-यानी आपल्या परिसरातील गुरुजनाँचे पूजन करावे.” मी तर अमरनाथ यात्रेत होतो. कारण पक्षाने दिलेले सर्व आदेशाचे मी काटेकोर पने पालन करीत असतो.मागे मन की बात चा कार्यक्रम मी अंदमान टूर मध्ये क्रूज मध्ये घेतला होता.मागच्या महिन्यात रत्नेश्वरी गडावर घेतला.

पण आता गुरु पौर्णिमेच काय करावे ? हा प्रश्न पडला.रस्त्यातील एका हॉटेलवर गाडी थांबवली.नाश्त्याची ऑर्डर दिली.नाश्ता तय्यार व्हायला वेळ होता. ग्रुप मध्ये कोणकोण शिक्षक, पुजारी आहेत त्यांनी समोर यावे अशी सुचना केली.प्राचार्य सुधीर शिवणीकर,उपप्राचार्य अजय संगेवार,प्राध्यापकी केल्या नंतर सिइवो झालेले पद्माकर केंद्रे, मुख्याध्यापक विरभद्र जाधव व बालाजी ढाकणे,भटजी मनोज जोशी,गजानन महाराज मंदिराचे पुजारी दिगम्बर गिरी, दुलाजी सूर्यवंशी, नरेंद्र जोशी, चित्ररेखा पांडे,माधव बामणे, अमरसिंह चौहान,दत्ता खानजोडे,कांचन जोशी, अनिता ढाकणे,विमल चव्हाण,सपना सातलवार हे शिक्षकवृंद पुढे आले.त्या सर्वांचे आम्ही भक्तीभावाने पूजन केले.पृथ्वीवरील नंदनवनात अनपेक्षित पणे मिळालेले आदरतिथ्य पाहून सर्व जण भारावून केले.योगायोगाने आज मुख्याध्यापक नारायण पांडे यांचा वाढदिवस होता.त्यांना दुहेरी शुभेच्छा दिल्या.


गरमागरम छोले भटूरे आणि चहा- कॉफीचा आस्वाद घेतला.सर्वांनी बिसलरी घेतली.बिल आले तेरा हजार रुपयाचे.किती विरोधाभास आहे पहा.अमरनाथ परिसरात पंचपकवाने कितीही खाल्ले तरी लंगर मध्ये मोफत.आणि श्रीनगर परिसरात दोन पुरी भाजी शंभर रुपयाला.कॉफी पन्नास ला तर चहा पंचवीसला. अतिरिक्त खर्चाची जबाबदारी सुधीर शिवनीकर ,अजय संगेवार, ॲड. रविन्द्र केंद्रे,नारायण पांडे यांनी घेतली. “यात्रा कुटुंब” कसं जोडले जातं याचं हे सुंदर उदाहरण.

गुलमर्ग – सुंदरतेतली सावली
गुलमर्गच्या डोंगराळ भागात नयनरम्य फुलांची पखरण होती,पण तितकाच घोडेवाल्यांचा आणि गाइड्सचा त्रासदायक अनुभव होता.मी आधीच सर्वांना सांगितले, “घोडेवाले गोंधळ घालतात. ग्रुप लीडर आता कोणी नाही.छोट्या ग्रुपमध्ये जीप ठरवून घ्या.”सर्वांनी सूचनांचं पालन केलं, संयम आणि सहकार्य हेच यात्रेचं बळ. हिवाळ्यात बर्फाळ झाल्यावर,गुलमर्ग हे जगातील टॉप स्कीइंग रिसॉर्ट्सपैकी एक मानले जाते, नवशिक्यांसाठी प्रशिक्षण, तर तज्ज्ञांसाठी चॅलेंजिंग उतार!
गंडोला – आशियातील सर्वोच्च रोपवेचा थरार
सर्वांचे लक्ष होतं, “गंडोला” म्हणजे रोपवे आशियातील सर्वोच्च आणि जगात दुसऱ्या क्रमांकाचा केबल कार प्रकल्प.गुलमर्ग ते काँगडोरी – पहिला टप्पा काँगडोरी ते शिखर – दुसरा टप्पा .बहुतेकांनी दोन्ही टप्प्याचं दर्शन घेतलं. निळ्या आकाशात हलणाऱ्या रोपवेच्या बासरीवर निसर्गाचं गाणं मनात झंकारत होतं… तेवढ्यात मुसळधार पाऊस सुरु झाला. सकाळीच सुचना दिल्यानुसार सर्वांसोबत रेनकोट,स्वेटर असल्यामुळे तारांबळ उडाली नाही. ३७४७ मीटर उंचीवरच्या बर्फावर पावसात मनसोक्त भिजणाचा आनंद अवर्णनीय.
रोमांचकारी गंडोला सफर झाल्यावर महाराणी मंदिर पाहिलं.या महादेव मंदिरात राजेश खन्ना-मुमताज यांचं “जय जय शिवशंकर” चं गीत जिथे चित्रित झालं होत, प्रसन्न शांततेचा क्षण अनुभवत असलेले हे मंदिर
काश्मीरच्या शेवटच्या राजे हरीसिंग यांच्या राणीने बांधलेलं. मंदिर शिव-पार्वतीला अर्पण. अत्यंत शांत, छोटं, टेकडीवर वसलेलं पण मनाच्या गाभाऱ्यात ठसलं गेलेलं.
‘खालसा’ आणि भक्तिभावाने सजलेलं भोजन
सर्वजण रोपवे राईडला गेले असताना मी खालसा हॉटेल ला गेलो.खालसाचे मालक सरदार भगतसिंग दिसले, त्यांनी लगेच ओळखले. “आम्ही सचखंड हुजूर साहेबचे यात्रेकरू आहोत.” हे पाहून त्यांच्या डोळ्यात आदर ओसंडला. त्यांचा सिरोपाव, प्रसाद आणि ट्रॉफी देऊन सत्कार केला. त्यांच्या छोट्याशा हॉटेलमध्ये सर्वांसाठी दुपारच्या जेवणाची ऑर्डर दिली. रूचकर जेवण म्हणजेच “सेवाभावाची मोठी थाळी” गेल्या वर्षी आमच्या सोबत आलेल्या एका भगिनीने नाव न जाहिर करण्याच्या अटीवर जेवणाची व्यवस्था यशस्वी झाली.
३७० हटल्यावर बदललेली काश्मीरची हवा
सरदार भगतसिंग यांच्याशी संवादात त्यांनी जुन्या काळाची आठवण सांगितली, “पूर्वी रात्री अतिरेकी घरी येऊन आम्हाला जबरदस्तीने जेवण बनवायला लावत. आता १० वर्षांत एकदाही त्रास नाही.” ३७० कलम हटल्यावर काश्मीरमध्ये भीती नाही, विश्वास आहे आणि शांतता आहे.
संध्याकाळची श्रीनगरला परतीची वाट आणि तृप्ततेचा शेवट
पाच वाजता परतीचा प्रवास सुरू झाला. श्रीनगरला पोहोचायला रात्र झाली.कालच्या जेवण वाटपात वेळ गेला, म्हणून आजचं पार्सल जेवण सुभाष देवकत्ते यांचे मित्र नांदेडचे जेष्ठ समाजसेवक शिवाजीराव गोरे तसेच प्रतिष्ठीत व्यापारी अमरनाथ यात्रेकरू श्याम हुरणे यांच्या वतीने शिकारा स्टँड ७ वरच देण्यात आलं.यात्रेत कोणीही मांसाहार करत नसल्यामुळे जेवण मुद्दामहून शर्मा ढाबा येथून मागविले होते. उत्तर भारतात, काश्मीरच्या कुशीत, आपल्या चवीनं आणि सेवाभावाने भरलेल्या त्या थाळ्या मनात गोड आठवण म्हणून साठवून ठेवण्यात आल्या.

