हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील सिरपल्ली येथे एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी सुमारे १.३० वाजता घडली. या आगीत सहा शेळीपिल्लांचा होरपळून मृत्यू झाला असून, घरातील साहित्य, धान्य व टिनपत्रा जळून खाक झाल्याने शेतकरी किसन आबाजी जाधव यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घर पूर्णतः जाळून गेल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे.

आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केल्याने घरातील सामान व जनावरे वाचवणे अशक्य झाले. ग्रामस्थांनी तत्काळ मदतीस धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.

विशेष म्हणजे, यावर्षी खरीप व रब्बी हंगामात आधीच नुकसान सहन करावे लागलेल्या या शेतकऱ्यावर आता घराला आग लागल्याने पुन्हा आर्थिक संकट कोसळले आहे. शेती, पशुधन व घरगुती साधनसामग्रीच्या नुकसानीमुळे कुटुंबाची परिस्थिती गंभीर बनली आहे.


या घटनेचा तातडीने पंचनामा करून शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांसह परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे. संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबाला तत्काळ मदतीचा हात मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


