हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या पाच-सहा दिवसात झालेल्या सततच्या पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रभाव होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. या अगोदर गोगलगायी आता येलो मोझॅक, किडींचा प्रादुर्भाव आणि सोयाबीनच्या पिकाबरोबर वाढू लागलेल तण यंदाचा खरीप हंगाम नुकसानदायक ठरतो की काय..? अशी चिंता शेतकरी वर्गात व्यक्त केली जात आहे.


हिमायतनगर तालुक्यात शेतकऱ्यांनी जून महिन्यात सोयाबीनची पेरणी केली. यास जवळपास महिना होत आला असून,अधून मधून झालेल्या पावसाने सोयाबीनची पिके वाऱ्यावर डोलू लागले आहे. सुरुवातीला सोयाबीनवर गोगलगायने आक्रमण केल्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला होता. बहुतांश सोयाबीनच्या पिकांना कुरतडून काढले त्यानंतर अळीचा प्रादुर्भाव झाला. दरम्यान दडी मारलेल्या वरून राजाने पावसाला सुरुवात केली. पाच ते सहा दिवस झालेल्या संततधार पावसामुळे तसेच फवारणीमुळे गोगलगायीचा बंदोबस्त झाला. मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव आणि सोयाबीन बरोबर ताणाची मोठी वाढ होताना दिसून येत आहे.


महिन्याभराच्या कोवळ्या पिकावर येलो मोझॅकचा प्रभाव पडल्याने यंदाचा खरीप हंगाम नुकसानदायक ठरतो की काय..? अशी चिंता शेतकरी वर्गाना सतावत आहे. येलो मोझॅक बरोबरच कीड वर्गीयांचा देखील प्रादुर्भाव जाणवू लागला असून, सोयाबीनच्या पानांची चाळणी होऊ लागली आहे. या पिवळ्या व्हायरस पासून कसे नियंत्रण मिळावे याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. मात्र हिमायतनगर शहराच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन होत नसल्याचे अनेक जागरूक शेतकरी बोलून दाखवित आहेत.


मागील काही वर्षाच्या काळात कापूस पिकाच्या पेरीमध्ये मोठी वृद्धी झाली होती. परंत्तू येणार खर्च मोठा असल्याने शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या खालोखाल सोयाबीन पीक पेरण्यावर भर दिला. सुरुवातीला सोयाबीचे पीक फायदेशीर ठरले मात्र मागील दोन तीन वर्षापासून सोयाबीन पिकावर येलो मोझॅक यासह विविध विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो आहे. यंदा तर एक महिन्याच्या सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रभाव आणि सोयाबीनच्या रानात वेगवेगळ्या प्रकारच्या ताणामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा हैराण झाला असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त करत आहे.

सोयाबीन बियाण्यात किंवा खतामध्ये काही प्रमाणात तण वाढविणारे बीज मिश्रण झाल्यामुळे कि काय..?रान शिवारात मोठ्या प्रमाणात सोयाबीन बरोबर तण वाढू लागले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे तण आणि वेलीच्या झाडांनी सोयाबीन पिकामद्ये शिरकाव केल्याने याचा बंदोबस्त करताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून बियाणे कंपनीच्या कारभाराबाबत शंका निर्माण होऊ लागली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्याच्या संगनमताने बियाण्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली कि काय..? असा संशय देखील शेतकरी व्यक्त करत आहेत. या संदर्भात तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करण्यासाठी दोन तीन वेळा कार्यालयात गेल्यानंतर त्यांची भेट होऊ शकली नाही.

