देगलूर, गंगाधर मठवाले| मागील अनेक दिवसांपासून देगलूर परिसरात सतत पावसाची संततधार सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे लेंडी नदीला महापूर आला असून नदीपात्रालगतच्या अनेक गावांना पाण्याचा वेढा बसलेला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर उभे पीक वाहून गेले असून, काही जनावरे व वाहने देखील पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. सुदैवाने मानवी जीवितहानी झालेली नाही.


या संकट काळात देगलूरचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मारुती मुंडे साहेब स्वतः रात्रंदिवस परिसराची पाहणी करत नागरिकांना सतर्क करत आहेत. आज सकाळी त्यांनी भायगाव रोडवरील पूल परिसराला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे भायगाव पूल पाण्याखाली गेला असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

पुराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी होत असल्याने कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी मुंडे यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना दिल्या. यावेळी भूगोल तज्ञ प्रा. डॉ. भीमराव माळगे यांनी लेंडी नदीचे महत्व, लेंडी प्रकल्पाची गरज व भविष्यातील पूरनियंत्रण उपाययोजनांबाबत माहिती दिली.


या पाहणीवेळी पोलीस प्रशासनातील अनेक कर्मचारी, पत्रकार, नागरिक उपस्थित होते. नागरिकांना पुराच्या ठिकाणापासून दूर राहण्याचे व अनावश्यक धोका पत्करू नये, असे आवाहन पो. नि. मारुती मुंडे यांनी केले.


