देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर शहरातील व्यंकटेश्वरानगर आणि घनश्यामनगर परिसरातील नागरिकांना प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या भागातील प्रसिद्ध इच्छापूर्ती महादेव मंदिर परिसरात पावसाचे पाणी साचून जागोजागी चिखल व दुर्गंधी पसरली असून, नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.


मंदिराभोवतीची मोकळी जागा नाल्यासारखी झाल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असूनदेखील रस्ता, स्ट्रीट लाईट व नाली बांधकाम अद्याप झालेले नाही. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल व पाणी साचल्याने नागरिकांना अत्यंत गैरसोयींचा सामना करावा लागतो. अलीकडेच चिखलामुळे शाळेची व्हॅन रस्त्यात अडकली आणि त्या भागातील मुलांना शाळेला जाता आले नाही, अशी धक्कादायक घटना घडली. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा व आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.


स्थानिक नागरिकांनी ही समस्या नगरपरिषद, माजी नगरसेवक तसेच आमदार जितेश अंतापूरकर यांच्याकडे वारंवार मांडली. मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि निष्क्रियता यामुळे व्यंकटेश्वरानगर व घनश्यामनगर परिसर आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक होत चालला असल्याची तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.



