Renapur Gram Panchayat : भोकर तालुक्यातील रेणापूर ग्रामपंचायतीचा नियमबाह्य पद्धतीने होतोय कारभार

भोकर | तालुक्यातील रेणापूर ग्रामपंचायतीत खोट्या स्वाक्षऱ्या करून विविध कामांमध्ये नियमबाह्य पद्धतीने कारभार चालवून गैरव्यवहार करण्यात आला आहे. सरपंच,ग्रामसेवक,ग्रामपंचायतीचा सेवक आणि ग्रामपंचायत सदस्याने केलेल्या गैरकारभाराची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.


उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की,गावात पाणीपुरवठा करणारे वीज पंप आणि साहित्य चोरीला गेल्याचे सांगण्यात आले. घरकुलच्या लाभार्थ्यांकडून निधी मंजूरीसाठी १०हजार तर ज्या लाभार्थ्यांनी घरकुल बांधली नाहीत अशाकडून ३० हजार रुपयाची रक्कम घेऊन त्यांना अंतिम देयके दिले जात असल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. गेल्या तीन वर्षापासून अंगणवाडीचे काम रेंगाळलेले असतानाही काम पूर्ण झाल्याचे दाखवून देयक उचलण्यात आली.

स्मशानभूमीच्या रस्त्याच्या कामातही गैरव्यवहार झाला असून ग्रामसेवकच कंत्राटदार असल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. ग्रामसभा आणि मासिक सभा न घेताच गेल्या दोन वर्षापासून बनावट आणि खोट्या स्वाक्षऱ्या करून ग्रामसभा घेतल्याचे शासन दरबारी दाखवण्यात येत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.मात्र भोकर पंचायत समितीच्या अधिकाऱ्याकडून चुकीचे काम करणाऱ्यांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे.निवेदनावर वाहेद खाॅं इब्राहिम पठाण, संदीप देवकते, गणपती गायकवाड, रामा जंगवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


ग्रामसेवक म्हणतात सर्व नियमानुसारच
या तक्रारी संदर्भात ग्रामसेवक विकास भारती यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सध्या बांधकाम सुरू असलेल्या अंगणवाडीचे आडवांस बिल उचलले आहे. अंतिम बिले उचलली नाहीत. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायत सदस्याकडे दाखले देण्यासाठी ठेवले होते. सीसी रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने भ्रष्टाचार कसला असा सवाल करून सर्व कामे नियमानुसारच झाले असल्याचे भारती यांनी सांगितले.



